मुंबई – जागतिक बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे भारतीय साखर निर्यात अकिफायतशीर ठरू लागली आहे. त्यामुळे साखर निर्यातदारांनी निर्यातीचे नवे व्यवहार कमी केले आहेत. जागतिक बाजारात साखरेचे दर वाढल्यानंतर निर्यात पुन्हा सुरू करण्यात येईल असे निर्यातदारांनी म्हटले आहे.
साखर निर्यातदाराच्या संघटनेने सांगितले की, सध्या जागतिक बाजारात साखरेचे दर 20 सेंट प्रति पाऊंड पेक्षा खाली आले आहेत. भारतामध्ये सरकारच्या सूचनेप्रमाणे उसाला वाढीव भाव दिला जातो. त्याचबरोबर साखर उत्पादनाची एकूण किंमत पाहता या दरावर निर्यात करणे परवडत नाही. पुन्हा साखरेचे दर 21 सेंटच्या वर गेल्यानंतर आम्ही साखर निर्यातीचे व्यवहार सुरू करण्याच्या शक्यतेवर विचार करू.
जागतिक बाजारात साखरेचे दर जास्त होते त्यावेळी भारतातील साखर कारखान्यांनी 35 लाख टन साखर निर्यातीचे व्यवहार आगोदरच केले आहेत. जागतिक बाजारात साखरेचे दर 21 सेंट असल्यानंतरच साखर निर्यात परवडते. सध्या जागतिक बाजारात हे दर 18.6 सेंटच्या खाली गेले आहेत.
न परवडणाऱ्या दरावर साखर निर्यातीचा दबाव कमी झाला आहे. कारण 34 लाख टन इतक्या साखरेसाठीचा ऊस इथेनॉल साठी वापरला जाणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 43 लाख टन साखरेची निर्मिती झाली होती. या वर्षापासून इथेनॉल उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामध्ये साखर कारखान्याचा वाटा मोठा असणार असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र अग्रेसर
याअगोदर झालेले व्यवहार महाराष्ट्र आणि दक्षिण राज्यातून झाले आहेत. महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील साखर उत्पादनाची किंमत उत्तरेकडील राज्यांपेक्षा बरीच कमी आहे. त्यामुळे उत्तरेकडून साखर निर्यातीचे व्यवहार फार कमी झाले आहेत. यावर्षी परिस्थिती सुधारल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत 47 लाख टन इतकी साखर तयार झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पर्यंत 16 लाख टन साखर तयार झाली होती. या वर्षी आतापर्यंत महाराष्ट्रात 20 लाख टन इतकी साखर तयार झाली आहे. या वर्षापासून इथेनॉल उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.