आळेफाटा – ‘काळ आला होता… पण वेळ आली नव्हती,’ या म्हणीचा प्रत्यय नारायणगाव येथील अपघातात आला. पुणे-नाशिक महामार्गावर नादुरुस्त स्थितीत असलेला ट्रक MH41G9396 सकाळी 10 वाजल्यापासून उभा होता. याबाबतीत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल प्रशासनाला माहीत असूनही सदर नादुरुस्त ट्रक हलविला नाही आणि खबरदारीचा उपाय म्हणून बॅरियर किंवा रिफ्लेकटरची ही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यांच्या अक्षम्य चुकीमुळे मागील पिकअप चालक विशाल भिसे (वय वर्ष 29)गाडी क्रमांक MH14 EM 3718 ही गाडी भरधाव वेगाने बंद स्थितीतील ट्रक न दिसल्याने ड्रायव्हर बाजूने ट्रक च्या मागील बाजूस घुसली.
अपघातामध्ये पिकअपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून पिकअप चालक बालंबाल बचावला. सदर दुर्घटना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून यासंदर्भात नारायणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाशिक-पुणे हायवेवर अशा प्रकारचे गंभीर प्रकार घडत असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली. याबाबत नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.