लखनौ – मथुरेतील अंब्रेला परिसरात बुधवारी हाय टेंशन पॉवर लाइन तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. विजेची तार पडल्याने दुचाकीने पेट घेतला. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर पती गंभीर भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुड्डी असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
तिरौली गावातील रहिवासी असलेले गिरिराज बुधवारी पत्नी गुड्डीसोबत तरौली-पसौली रस्त्याने दुचाकीवरून जात होते. अचानक विद्युत तार तुटून दुचाकीवर पडली. त्यानंतर दुचाकीने पेट घेतला. या अपघातात गुड्डीचा जळून मृत्यू झाला. यात गिरीराज गंभीर भाजला आहे. तेथून जाणाऱ्या लोकांनी दुर्घटना पाहिल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद केला. गिरीराजला दुचाकीपासून वेगळे करून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेसाठी ग्रामस्थांनी विद्युत विभागाला जबाबदार धरले आहे.
खराब झालेले विद्युत वायरिंग बऱ्याच दिवसांपासून बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे या दुर्घटनेला सर्वस्वी वीज महामंडळ जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, वीज महामंडळाचे अधीक्षक अभियंता आनंद प्रकाश शुक्ला यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई आणि इतर मदत दिली जाईल.