मुंबई – “धनुष्यबाण हा शिवसेनेचा व शिवसेनाप्रमुखांचा आहे. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. परंतू, राजमान्यता मिळाली तरी शेवटी चोर हा चोरच असतो. नामर्दच चोरी करू शकतो; त्यामुळे तो कितीजरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही,’ अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, निवडणूक आयोग, भाजपासह मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला.
शिवसैनिकांनो खचू नका
ठाकरे पुढे म्हणाले, “धनुष्यबाण चोरण्याचे पेढे त्यांना खावू द्या, एखाद्याच्या चोरीलाच जर स्वायत्त संस्थांतर्फे मान्यता मिळत असेल तर हे देशातील लोकशाहीला परवडणारे नाही. म्हणून शिवसैनिकांनो पुन्हा एकदा सांगतो मी खचलेलो नाही तुम्हीही खचू नका. संयम बाळगा. आपण मैदानात उतरलो आहोत, त्यामुळे विजय मिळाल्याशिवाय आता माघारी परतायचे नाही.’
लोकशाही संपली हे लालकिल्ल्यावरून सांगा
ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशात लोकशाही संपुष्टात येवून बेबंदशाही सुरु झाली आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावे. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येते, याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. त्यात तथाकथीत स्वायत्तसंस्था असणाऱ्या आयोगाने सर्वोच्च न्यायालयात खटला चालू असताना आपला निर्णय देण्याची घाई करणे अनपेक्षित आहे. कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील लागतील. कारण त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचे आहे, असेही ठाकरेंनी म्हटले.
निवडणूका घ्या; मिंधेंना जागा दाखवू
“हिंमत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाणाचे तेज जनता मिंधे गट आणि भाजपला नक्कीच दाखवेल, असा इशाराही असे ठाकरे यांनी यावेळी दिली. यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.
उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे
– देशातील लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.
– महाराष्ट्रातील घराघरात मशाल पोचवू.
– निवडून आलेल्यांवर पक्ष ठरायला लागला तर धनाढ्य देश चालवतील.
– गद्दारांना मांडीवर घेतलेल्या पक्षाची किव वाटते.
– शिवसेना संपलेली नाही; जनताच उत्तर देईल.
– छत्रपतींचा महाराष्ट्र धृतराष्ट्राप्रमाणे लोकशाहीचे वस्त्रहरण खपवून घेणार नाही.