पुणे – प्रवाशांना गारेगार प्रवासाचे स्वप्न दाखवून एसटी महामंडळाने 7 वर्षांपूर्वी “शिवशाही’ बस भाडेतत्वावर घेतल्या. या बसेसची अवस्था दयनीय आहे. सातत्याने अपघात आणि गैरसोयी, बकालपणा पाहता, “शिवशाही’ हे नाव वापरण्याचा अधिकार तरी महामंडळाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवशाही बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होत आहेत. ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास दि. 4 एप्रिल या एकाच दिवशी दोन “शिवशाही’ बसला आग लागली. नाशिक येथे स्थानकात परतलेल्या बसने पेट घेतला. दुसऱ्या घटनेत नागपूर-अमरावती धावत्या बसने पेट घेतला.
अशा घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. हे प्रकार राज्यभरात वारंवार घडत आहेत. बसमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, किंवा त्यांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नाही, हे सांगण्यासाठी “मेकॅनिक’ची गरज नाही.
…तरीही भाडेतत्वावर बस
कर्नाटक, आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून महामंडळाने हजारावर बस भाडेतत्वावर घेतल्या. महामंडळाचे स्वत:चे छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुण्यात दापोडी येथे बसबांधणी कारखाने आहेत. पण, कोणत्या राजकीय नेत्याच्या हट्टापायी प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
चालक खासगी कंपन्यांचा..
शिवशाही बस भाड्यापोटी संबंधित ठेकेदाराला प्रति किलोमीटर 18 ते 20 रुपये याप्रमाणे भाडे द्यावे लागते. याव्यतिरिक्त बसचे इंधन, वाहक आणि टोलचा भार महामंडळाच्या माथी आहे. विशेष म्हणजे, या बसचे चालक हे खासगी आहेत. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमीदेखील राहिलेली नाही.
दुर्घटना आणि गैरसोयी
आग लागणे
टायर फुटणे
इंजिन फेल होणे
अस्वच्छता
ए.सी. बंद असणे
फाटक्या सीट
अस्वच्छ बस