पुणे -जुन्नर, खेड, शिरुर, पुरंदर आणि पूर्व हवेली क्षेत्रात बिबट्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षांत कात्रज परिसरातील गुजरवाडी, घाट परिसर, मांजरी, मुंढवा, हडपसर भागांतही बिबट्याने शिरकाव केला. काही दिवसांपूर्वी वारजे भागात दाटीवाटीच्या मानवी वस्तीत बिबट्याने आसरा घेतला. हे पाहता बिबट्यांचा अधिवास नेमका कोणता? असा प्रश्न आहे.
वन्यजीवांच्या अधिवासावर मानवाने अतिक्रमण केले. या जीवांना राहण्यासाठी, लपण्यासाठी आता जागाच उपलब्ध नसल्याने आता त्यांनीही मानवी भागाकडे धाव घेतली आहे. राज्यात सध्या सुमारे 2,800 बिबटे आस्तित्वात असल्याची नोंद काही संस्थांनी केली आहे. मात्र, त्याबाबत ठोस सांगता येत नसल्याने त्यांनी संस्थेचे नाव प्रकाशित न करण्याची अट ठेवली. पण, “बिबट्या’ प्रकरणात वन विभाग गंभीर नसल्याचा आरोपही या संस्थेने केला.
व्याघ्र प्रकल्पांत आश्रय
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्य, विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, बोर अभयारण्य, पेंच, नवेगाव -नागझिरा येथे बिबटे आश्रयास आहेत. जंगलात बिबट्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. परिणामी, त्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. या बिबट्याला पुन्हा जंगल किंवा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाते. यामुळे तेथेही बिबट्यांची संख्या वाढली आहे.
अन्न मिळवण्यासाठी
बिबट दीड वर्षे वयाचा होताच शिकारीसाठी सज्ज होतो. पुढे तो शिकारीच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडतो. उसाचे मळे, संत्री-मोसंबीच्या बागा, मुबलक पाणी असलेले ठिकाण, शिकारीची सोय असलेल्या भागात त्यांचा वावर वाढला आहे. बिबट मादी एकाच वेळी चार बछडे जन्मास घालते. पुढे हे बिबटे मानवी वस्तीकडे येतात.
बोलके आकडे
वर्ष : 2022
शिकार, तस्करी
162
मृत्यूची अन्य कारणे 356
एकूण बिबट्यांचा मृत्यू 518
वर्ष : 2023
शिकार, तस्करी
44
मृत्यूची अन्य कारणे 113
एकूण बिबट्यांचा मृत्यू 157
स्रोत : वाइल्डलाइफ प्रोटेक्शन ऑफ इंडिया