भारतीय कालमापन पद्धतीत मास (महिना) चंद्रावरून मोजला जातो. अमावास्यांत मास (अमावास्येला संपणारा) किंवा पौर्णिमांत मास (पौर्णिमेला संपणारा) अशी मासगणना केली जाते. आपले बहुतेक सण, उत्सव, देवतांच्या जयंती इत्यादी चांद्रमासानुसार म्हणजे तिथीनुसार साजरे केले जातात.
याचे कारण म्हणजे सूर्याचा परिणाम अधिकतर स्थूल सृष्टीवर आणि स्थूल देहावर होतो, तर चंद्राचा परिणाम सूक्ष्म सृष्टीवर अन् सूक्ष्म देहावर (मनावर) होतो. स्थूल ऊर्जेपेक्षा सूक्ष्म ऊर्जा अधिक प्रभावी असते. शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ अधिक महत्त्वाचे असते. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त परिणाम पृथ्वीवर होतो. अतः हिंदु धर्मात दिनांकाऐवजी चंद्राच्या तिथीला महत्त्व दिले गेले आहे.
पंचागाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच अंगे आहेत. या पाच अंगाचा पंचांगात कालगणनेसाठी विचार केला जाते. त्याचबरोबर सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी इत्यादीचा बोध पंचागातून होतो. याच पाच अंगांशी ‘करण’ आणि ‘भद्रा काळ’ याचा संबंध आहे. करण अकरा असतात. त्यातील एक करण म्हणजे विष्टी करण. ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे.
तिथीचे प्रकार
नंदा तिथी – आनंद देणाऱ्या असतात
भद्रा तिथी- कल्याणकारी असतात
जया तिथी – जय देणाऱ्या असतात
रिक्ता तिथी – अशुभ असतात
पूर्णा तिथी- पूर्ण करणाऱ्या आसतात
भद्राकाळ अशुभ मानला जातो. बारा राशीच्या संक्रमणात चंद्र भ्रमण मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीतून होताना भद्रा तिन्ही लोकापैकी ‘स्वर्ग लोकात’ असते. तर कन्या, तुळ, धनु, मकर राशीत भद्रा ‘पाताळ लोकात’ आणि कर्क, सिंह, ‘कुंभ’, मीन राशीत असता भद्रा ‘पृथ्वी लोकात’ असते. त्यानुसार ३० ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र ‘विष्टी’ करण आणि ‘कुंभ’ राशीत असणारं आहे. याच अनुषंगाने या दिवशी भद्राकाल वर्तविला जात आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते.
भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेलं आहे. धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनीदेवाची बहीण आहे. भद्रा देखील शनीदेवाप्रमाणेचं शीघ्रकोपी, विघ्नसंतोषी होती. बालपणापासूनच ती ऋषीमुनींच्या दैवी, धार्मिक कार्यात, उपासनेत विघ्न आणत असे. सूर्यदेवानी ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली. त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टी करणात स्थान दिले. भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल. भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता आहे
रक्षाबंधनास बहिणीने धार्मिक विधींचं पालन केल्यास भावाच्या जीवनात सकारात्मकता येवून करियरमध्ये प्रगती होण्यास मदत होते. ताटातील अक्षता ओल्या कराव्या. त्यानंतर बाळकृष्णाल किंवा कुलदैवतेला सर्वात आधी एक राखी अर्पण करायला हवी. त्यानंतर राखी बांधताना भावाचा चेहरा पूर्वेला तर बहिणीचा पश्चिम दिशेला असायला हवा
राखी बांधताना कोणते मंत्र म्हणाल?
१. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥
२. “सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥
बहीण राखी बांधत असेल तर त्यावेळी भावाच्या डोक्यात टोपी, फेटा किंवा पगडी असायला हवी. त्यानंतर बहिणीने अक्षता लावायला हव्या. त्यानंतर बहिणीने भावाच्या उजव्या हातावर राखी बांधावी. त्यानंतर भावाला गोड पेढा खाऊ घालायला हवा. त्यानंतर भावानेही बहिणीला वाकून नमस्कार करावा