पिंपरी – शासन ज्या ठिकाणी पोहचत नाही तिथे पक्ष आणि कार्यकर्ता पोहचला पाहिजे. गरीब, शोषित, अन्यायग्रस्त अशा समाज घटकांसाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतेच केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे निगडी-प्राधिकरण येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. सोशल डिस्टंसिंग पाळत पक्षाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या प्रसंगी पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची औपचारिक घोषणा पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक नीरज कडू यांनी दिली.
नीरज कडू म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराचा भाग म्हणून पक्षाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिले आहे. बच्चू कडू यांचे समाजकार्य आणि त्यांची जनमानसात असलेली स्वच्छ प्रतिमा याचा पक्षाला विस्तारात निश्चितपणे फायदा होईल. पुढील काळात जनसामान्यांच्या समस्यांना पक्ष वाचा फोडत राहील. सर्व प्रकारच्या पुढील काळातील निवडणुका लढविण्याची तयारी पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवावी.
पक्षाचे प्रवक्ते अजय महाराज बारस्कर, पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. नंदकिशोर जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी, शेतकरी संघटना पदाधिकारी संतोष पवार,मंगेश फडके, हवेली तालुकाध्यक्ष महेश कनकोरे, दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, तुकाराम रणदिवे,बाळासाहेब मराठे, अजिंक्य बारणे आदी उपस्थित होते.