– विजय शेंडगे
आई हे मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वपूर्ण नाते आहे. त्यामुळेच आईविषयी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. कविता, कथा, कादंबरी अशा विभिन्न साहित्य प्रकारात आईचे गोडवे गायले गेले. “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ असं म्हणताना जन्मदात्या पित्याचं महत्त्व दुर्लक्षित करण्यात आलं.
“आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’ ही आईचं मोठेपण सांगणारी फ. मु. शिंदेंची कविता देखील अशी सुपरिचित आहे. साने गुरुजींच्या “श्यामच्या आई’ने तर इतिहास घडवला. शालेय परीक्षेत “माझी आई’ असा विषय निबंधलेखनासाठी असतो.
आई अशी सर्वांगाने मुलांच्या मनावर बिंबविण्यात आली आणि “बाबा’चा बागुलबुवा उभा करण्यात आला. परंतु बदलत्या काळातील साहित्यिकांना “बाबा’ची दखल घेण्याची गरज वाटली. बघता बघता जन्मदात्या “बाबा’विषयी साहित्यातून बोलले जाऊ लागले.
इंद्रजित भालेराव यांची “माझा शेतकरी बाप’ ही अशीच एक सुपरिचित कविता. माझ्या एका कवितेत –
“बाबा असतो नेहमी सही,
बाबा म्हणजे पायाखालची भुई’
असं म्हटलं आहे. आईविषयीच्या साहित्यात एकीकडे “श्यामच्या आई’चं नाव घ्यावं लागेल, तर दुसरीकडे डॉ. नरेंद्र जाधव यांचं “आमचा बाप अन् आम्ही’ हे पुस्तक ठेवावं लागेल. साहित्यिक गोविंद काळे यांचं “बापाचा बाप’ हे पुस्तकदेखील बापाचं मोठेपण अधोरेखित करतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. मुरहरी केळे यांचं “जगी ऐसा बाप व्हावा’ हे व्यक्तिचित्र देखील आपली मुद्रा ठसवू पाहते.
डॉ. मुरहरी यांचे वडील सोपान आबाजी केळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारी ही साहित्यकृती. स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 सालातील जन्म असणारे सोपानकाका. शिक्षणाच्या सुविधा नाहीत. जातीने धनगर. घरात सगळेच अशिक्षित. काकाही शाळेत न जाता मोठे होतात. पण पुढे एका मास्तरांना गळ घालून बाराखडी शिकण्याचा आग्रह करतात. थोडीफार अक्षरओळख होते. ते मास्तर अचानक नाहीसे होतात.
सोपानकाका मात्र तसेच अशिक्षित राहतात. असे असतानाही त्यांनी संत साहित्य मुखोद्गत केलं. कीर्तन केलं. वारकरी पंथाचा मार्ग स्वीकारला. आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करत आयुष्याला तोंड दिलं. अनेक संत वचनांचा दाखला देत मांडलेलं हे चरित्र काहीसं विस्कळीत वाटत असलं तरी वाचनीय झालं आहे.
अशिक्षित असणारा बाप स्वतःसह मुलांची प्रगती होईल याची दक्षता घेतो असे उदाहरण फारच अपवादाने सापडते. अत्यंत उत्तम छपाई, बोलके मुखपृष्ठ आणि वारकरी संप्रदायाचा, संत साहित्याचा प्रभाव ही या व्यक्तिचरित्राची वैशिष्ट्ये सांगता येतील.