मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन फेब्रुवारीला बोलावली आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेशी युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज ठाकरे यासंदर्भात काय भाष्य करतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले. या बैठकीत या पालिकेत मनसेची ताकद असणाऱ्या जागा आणि काही भागात जिंकू शकल्या जाणाऱ्या जागा यांची चर्चा करण्यात येणार असून या निवडणुकीत पुन्हा नव्याने भरारी घेण्याची रणनिती मनसेने आखली आहे, त्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
या बैठकीनंतर एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपाशी युती करण्यासंदर्भात सुरू असणारी चर्चा आणि त्यासंदर्भात राज ठाकरे टाकत असलेली सावध पावले यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मनसेच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत असेल. पण गेल्या निवडणुकीप्रमाणे ही लढत अटीतटीची होऊन शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये थोडक्या जागांचा फरक असेल तर सत्ता स्थापनेत मनसे हा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपने मनसेशी जवळीक वाढवली आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी मुंबईत विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका लावला आहे.