मुंबई – महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सभागृह सोडावे लागले. आम्हीही विरोधी पक्षात होतो पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांचे स्वागत केले. मात्र भाजपच्या लोकांनी गोंधळ घातला, फलकं झळकवली त्यामुळे राज्यपाल कोश्यारी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रिया देखील जयंत पाटील यांनी दिली.