पालकमंत्री राम शिंदे : कोपरगावातील पूरग्रस्तभागाची केली पाहणी
कोपरगाव – चांदेकसारे ते डाऊच, देर्डे ते डाऊच या दोन रस्त्यांचा भराव दहा फुटाने वाढविण्यात येईल, तसेच पूरग्रस्तांचे पर्यायी पुनर्वसन करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्र्यांसह तत्काळ बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
गोदावरी नदीस रविवारी (दि.4) आलेल्या महापुरामुळे डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक व हिंगणी येथील नागरिकांना त्याचा तडाखा बसला. आपत्तीग्रस्त भागाची पाहणी आज पालकमंत्री शिंदे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूरपरिस्थितीची माहिती दिली.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शहरासह ग्रामीण भागातील 18 गावांना पुराचा फटका बसल्याचे सांगितले. प्रांताधिकारी गोविंदे शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी शासनासह अन्य सामाजिक संस्था, संघटनांनी केलेल्या मदतीची माहिती देऊन पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे सांगितले. भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन, संचालक शिवाजीराव वक्ते, आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षक सो. सा. गायकवाड यांनी डाऊच पूरग्रस्त पुनर्वसनासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रभारी गटविकास अधिकारी पंडित वाघिरे, जिल्हा पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, कल्याण दहे, पोपटराव दहे, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक उपस्थित होते. डाऊचच्या सरपंच पुष्पाबाई गणपत माळी, उपसरपंच सुनीता ढमाले, हिंगणीच्या सरपंच जिजाबाई जयवंत पवार, उपसरपंच किरण दहे, सुनील माळी, पंडित पवार, दत्तात्रय पवार यांनी पूरग्रस्तांचे पुनर्वसनासाठी मदतीची मागणी केली. पालकमंत्री शिंदे म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे गोदावरीने किती रौद्र रूप धारण केले होते, याची कल्पना आपणास असून, पुरामुळे शेती पिकासह शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले. त्यासाठी खरीप, रब्बी पीक, बोंडअळी अनुदान शासन देते. त्याप्रमाणे उपाययोजना निश्चितपणाने करू, असे ते म्हणाले.