पुणे, दि. 15 -“सरकार उत्तम चाललेले आहे. रोज लोकोपयोगी नवीन निर्णय होत आहेत. त्यामुळे कुणीही नाराज नाही. नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था आमच्या सरकारकडे आहे,’ असे प्रत्युत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला. “शिंदे-फडणवीस सरकार पुढील अडीच वर्षे टिकणार नाही. कारण अपक्ष आमदार नाराज आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच माजी मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच केली आहे. त्यासंदर्भात पाटील यांनी वरील दावा केला.
पाटील म्हणाले, “सेक्सटॉर्शनबाबत या आठवड्यात पालकमंत्री म्हणून सर्वच विषयांचा आढावा घेणार आहे. पोलीस मुख्यालयाचा आढावा घेताना हा विषय उपस्थित करणार आहे. काय उपाययोजना करण्यात येणार आहे, तक्रार नोंदविण्यापासून प्रबोधन तसेच धाडस वाढविण्यासाठी कारण अनेकवेळा तक्रारच नोंदविण्यात येत नाही. त्यामुळे प्रसंग आत्महत्येपर्यंत जातो. हे थांबवणे आवश्यक आहे.’