पाथर्डी – वांबोरी चारीचे पाइप काही ठिकाणी फुटले आहेत, तर अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. पाच ते सहा दिवसांत फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती केली जाईल. त्याचबरोबर लिकेज काढून गावागावातील बंधाऱ्यात वेळेवर व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व्ही. डी. पाटील यांनी दिले.
तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांतील बंधारे मुळा पाईप चारी योजनेतून भरले जातात. सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके जळू लागली आहेत. वांबोरी पाइप चारीतून पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांत पाणीपुरवठा होत नसल्याने बंधारे कोरडेठाक आहेत. यांसह अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घातल्या. आ. तनपुरे यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मिरी येथे संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करून जाब विचारला.
करंजी, तिसगाव येथील पाची आंबा व खारूळ नाला तलाव, भोसे, कडगाव येथील तलावात पाणी येत नसल्याची तक्रार उपस्थितांनी केली.
योजनेचे अनेक ठिकाणी पाइप फुटले आहेत, अनेक ठिकाणी लिकेज आहेत. लिकेज व फुटलेली पाईप दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. येत्या सहा दिवसांत योजना दुरुस्त करून तलावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन पाटबंधारे विभागाची उपअभियंता पाटील यांनी या वेळी दिले.
बैठकीला शाखा अभियंता व्ही. एम. मोगल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, तिसगावचे सरपंच इलियास शेख, जालिंदर वामन, आ. तनपुरे यांचे स्वीय सहायक विजय टापरे, इस्माईल पठाण, बाळासाहेब लवांडे, नितीन लवांडे, सुनील पुंड, रमेश लवांडे, पंकज मगर, भैया शेख, विलास टेमकर, अशोक टेमकर, पोपट आव्हाड, किरण शेलार, अशोक गाडेकर, सुरेश लवांडे यांसह परिसरातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.