विश्रांतवाडी – खराडी-चंदननगरमधील बोराटेवस्ती, तुळजाभवानी नगर, दिनकर पठारे वस्ती, पठारे-ठुबे नगर, चव्हाणनगर, शेजवळ पार्क, सूर्यप्रकाशनगर, समर्थनगर या भागात कमी दाबाने व अनियमित तसेच काही ठिकाणी पाणी पुरवठाच होत नाही. बोराटेवस्ती व साई पार्क येथे गाळमिश्रित पाणी येते, वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नव्हती.
याशिवाय व्हॉल्वमनकडून जाणीवपूर्वक कमी दाबाने पाणी सोडणे, 10 मिनिटांत पुरवठा बंद करणे, अशा तक्रारी वाढल्याने अखेर वडगावशेरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामार्फत बंडगार्डन पंपिंग स्टेशन येथील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत “जल आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामार्फत माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, खराडी परिसरात एक दिवसाआड पाणी पूरवठा होत आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वडगावशेरी मतदार संघात पाणी समस्या सातत्याने जाणवते. टॅंकरद्वारे देखील वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. पाणी टॅंकर खरेदी करावे लागत आहेत. याबाबत वरिष्ठ पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. यातून नागरिक संतप्त झाले आहेत. यामुळे आंदोलन करत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणीचे निवेदन पाणी पुरवठा अधिकारी रमेश वाघमारे व नितीन जाधव यांना देण्यात आले.
या आंदोलनामध्ये मतदारसंघ अध्यक्ष नानासाहेब नलावडे, नारायण गलांडे, माजी नगरसेविका सुमन पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, निता गलांडे, सदाशिव गायकवाड, पूजा काटकर, शीतल साळवे, दर्शना पठारे, नानासाहेब आबनावे, किरण खैरे, स्वप्निल पठारे, राजेश आबनावे, अमित सालके, पोपट क्षिरसागर, मोरेश्वर चांधेरे, निखील गायकवाड, सुरज कोठावळे तसेच परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.