नेवाशाचे ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर. या मंदिराचा इतिहास महाराष्ट्रच नव्हे तर देशभरांतील मराठी माणूस कधीही विसरू शकणार नाही. नेवासा या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात “भावार्थदीपिका’ हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. हाच ग्रंथ “ज्ञानेश्वरी’ म्हणूनही ओळखला जातो. या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सच्चिदानंदबाबांना सांगितली आणि त्यांनी ती लिहून घेतली आणि त्यानंतर “अमृतानुभव’ ग्रंथ देखील त्यांनी इथेच रचला.
गोदावरीच्या तीरावर वसलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. दहा-बारा पायऱ्या चढून वर गेले की मंदिराच्या सभागृहात जाता येते. या पायऱ्यांची ठेवण सुंदर आहे. तीनही बाजूंनी त्या चढता येतात. मंदिराला प्रशस्त आवार आहे. गुरुदेव सोनोपंत दांडेकरांच्या प्रेरणेने रांजणगावच्या (देवी) स्व. बन्सी महाराज तांबे यांनी भूमीपूजन 1949 मध्ये केले आणि 7 मे 1956 मंदिर पूर्णत्वास आले. प्रवरेच्या काठावरील या मंदिराला प्रशस्त प्रांगण आहे.
गाभारा, सभागृह, निवासस्थान त्याचबरोबर येथे वसतिगृह देखील आहे. या मुलांसाठी अन्नछत्र चालवले जाते. मंदिराचे आजचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख आणि विश्वस्त मंडळी येथील व्यवस्था पाहतात. या मंदिराचे अनावर हभप शं.वा. (मामा) दांडेकर यांच्या हस्ते झाले आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती, करविरेश्वराची पिंड असून ज्ञानेश्वर-तुकोबा, सच्चिदानंद बाबा, निवृत्तीनाथ यांच्या मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूस दत्त मंदिर आहे. एकनाथ महाराज षष्ठी सोहळा पैठणला झाल्यावर नेवासाला पैस मंदिरात येऊन माउलींचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव
मंदिरात आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला मोठा उत्सव असतो. कार्तिकी एकदशीही तितक्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. याचबरोबर माऊलींचा संजीवन समाधीसोहळा आणि ज्ञानेश्वरी जयंती (भाद्रपद व. षष्ठी) ही साजरी केली जाते.
माऊली उद्यान
माऊली उद्यानाची निर्मिती गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी येथे करण्यात आली असून, माऊलींच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार असलेल्या या मंदिराचे महत्त्व सांगणारे माऊली ज्ञानेश्वरी सांगत आहेत, सच्चिदानंद बाबा ती लिहून घेत आहे, असे म्यूरल येथे बसविण्यात आले आहे.
शके बाराशे बारोत्तरे । तै टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंद बाबा आदरे । लेखकू जाहला ।।
नेवासे क्षेत्री माउलींनी गुरू निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून वयाच्या 16व्या “ज्ञानेश्वरी’ सांगितली आणि सच्चिदानंदबाबांनी लिहून घेतली. हे ठिकाण संभाजीनगर जिल्ह्यापासून 55 किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रस्त्यावर आहे. शुद्धीपत्राच्या मागणीसाठी माउली आणि त्यांची चार भावंडे पैठणला गेली, तिथे धर्मवृंदांनी शुद्धीपत्रास नकार दिल्यावर ईश्वर सर्वांभूती आहे, याची प्रचीती धर्ममार्तंडांना देण्यासाठी माऊलींनी रेड्यामुखी वेद म्हणवून घेतले. यानंतर धर्ममार्तंडांनी या चार भावंडांना शुद्धीपत्र दिले. पुढे पैठणहून आळंदीला जाताना नेवासे क्षेत्री करवीरश्वराच्या हेमाडपंथी मंदिरात माउलींचा मुक्काम दोन ते अडीच वर्षे होता.
जगातील खांबाचे (पैसाचे) एकमेव मंदिर…
मुख्य गाभाऱ्यात माऊली ज्या पैसाला टेकून बसले होते तो दगडाचा खांब आहे. या दगडाला “चिंतामणी’ स्वरूप प्राप्त झाले आहे. या पवित्र खांबावर चंद्र, सूर्य यांच्या मूर्ती कोरलेल्या असून त्यावर सुंदर शिलालेख आहे.
ओन्नमः (कर) विरेश्वराय ।
पिता महेन यत् पूर्व (दत्त)
षटकं जगर्दे गुरो ।