खांदी पताका घेऊनि…
वारी निघाली…निघाली…
सारी विष्णुमय झाली…
लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी इंद्रायणीच्या काठावरून चंद्रभागेच्या तिरी जाण्यासाठी निघतात. मुखी विठ्ठलाचे नाम, गळ्यात तुळशीची माळ, हाती टाळ आणि खांद्यावर वैष्णव धर्माची भगवी पताका…मजल-दरमजल करत कुठलाही शीण न येता, ही विठुरायाची लडिवाळ लेकरं वारीतील प्रत्येक टप्पा लीलया पार पाडतात. याच वारी-पालखीतील महत्त्वाची परंपरा म्हणजे, रिंगण सोहळा.. माउली आणि तुकोबारायांच्या पालख्यांच्या तळावर रंगणारा हा सोहळा भक्तीभावाचे अनोखे नाते व्यक्त करणारा असतो. रिंगणावेळी शिस्तबद्धता, हरिनामाचा अखंड जयघोष…भक्तांची गर्दी हे सगळे वातावरण डोळ्यांसमोर उभे राहते. रिंगण भरधाव वेगाने दौडणारा माऊलींचा अश्व आणि लाखो वारकऱ्यांचा एकच गजर…हे भारावलेले वातावरण डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
रिंगण म्हणजे काय?
“रिंगण’ म्हणजे वर्तुळ. वारीतील “रिंगण’ म्हणजे म्हणजे पालखीभोवती गोल फिरणे. रिंगणाचे ठिकाण हे एक मोठे मैदान असते. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. यासाठी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे.
रिंगण सोहळा कधी सुरू झाला?
संत श्री तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री नारायण महाराज यांनी हा रिंगण सोहळा सुरू केल्याची मान्यता आहे. तर, श्री हैबतराव बाबांनी ही परंपरा पुढे चालवली. हैबतराव बाबा आळंदीत माऊलींच्या मंदिरातच ते राहायचे. तेथे एकदा अंकलीचे शितोळे सरकार दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांची भेट हैबतराव बाबांशी झाली. रिंगण सोहळ्यासाठी बाबांनी शितोळे सरकारांकडे मदत मागितली. सरकारांनी लगेच आपले अश्व देऊ केले आणि तिथून या रिंगण सोहळ्याची परंपरा पुढे आली.
असे असते रिंगण
पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोहचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे असतात. रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर-तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, हाती पताका घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्ररित्या पळतात. रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. यात एका अश्वावर जरीपटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात, अशी श्रद्धा आहे. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यांत अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात.
“रिंगण’चे प्रकार
1. गोल रिंगण : रिंगण परंपरेतील गोल रिंगण हा सोहळा पूर्वापार चालत आला आहे. याबाबतची माहिती वरील उल्लेख केली आहे. तळावर पालखीच्या भोवती वाट आखून दिलेली असते. भोवती वारकरी असतात. पालखी भोवतीच्या मार्गावर हे अश्व दौड घेतात.
2. उभे रिंगण : गोल रिंगणाप्रमाणे उभे रिंगण हाही एक रिंगणाचा प्रकार आहे. यात दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता, पालखीच्या दोन्ही बाजूंनी समोरासमोर उभ्या राहतात. या मधून अश्व दौडतो.
3. उडीचा खेळ : रिंगण सोहळ्यानंतर उडीचा खेळ घेतला जातो. यात मध्यभागी पालखी ठेवून कडेने कमलपुष्पाच्या आकाराप्रमाणे टाळकरी बसतात. टाळ आणि पखवाजाच्या अखंड ठेक्यांवर “ज्ञानबातुकाराम’चा गजर सुरू असतो. अशावेळी पाऊस, चिखल याची तमा न बाळगता हे वारकरी अखंड नामस्मरण करतात. याउलट पाऊस आणि चिखलातही या उडीच्या खेळाच्या आनंद द्विगुणित होत जातो.
4. मेंढीचे रिंगण : संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढीचे रिंगण आयोजित करण्याची परंपरा आहे. सोहळ्याच्या मार्गावर असलेले मेंढपाळ भाविक आपली मेंढरे घेऊन पालखीत सहभागी होतात. ही मेंढरे रथाभोवती प्रदक्षिणा घालतात.
रिंगण सोहळा कोठे कोठे असतो… संत ज्ञानेश्वर महाराज पालखी-
चांदोबाचा लिंब तरडगाव, बाजीराव विहीर-पुरंदवडे, खुडुस फाटा-माळशिरस, ठाकुरबुवा समाधी-भंडीशेगाव, वाखरी (पंढरपूरजवळ)
संत तुकाराम म्हाराज पालखी- बेलवंडी, इंदापूर, अकलूज, माळीनगर बाजीराव विहीर, वाखरी
“वारकरी या रिंगणात खेळताना सुखाने इतके धुंद होतात, की ब्रह्मैक्यभावाने कसे एकरूप झाले, हेदेखील विसरले आहेत. जीवनाच्या परिघात ही सामरस्याची अनुभूती घेणे हेच रिंगण आहे. एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून, ध्यात्याने पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे, हे रिंगण होय. प्रत्येकाला आपल्या ध्येयाचे, न्यायाचे, वृत्तीचे, कर्माचे, पुरुषार्थाचे रिंगण समजायला हवे. हे रिंगण उभे करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो, तो जीवनवारीचा आनंदयात्री होतो,’ असा गोड भावार्थ संत साहित्याचे गाढे अभ्यासक वै. ह.भ.प. डॉ. रामचंद्र देखणे यांनी नोंदवून ठेवला आहे.