सुचित्रा पवार
दिवा… तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा… दिव्याची ज्योत स्वतः जळत राहते आणि इतरांना प्रकाश देते, कधी फडफडते, कधी स्थिर राहते पण अखंड तेवत राहते आणि सभोवतालचा परिसर प्रकाशमान करत राहते. इवलासाच प्रकाश पण अंधार भेदण्याचे सामर्थ्य बाळगून असतो. प्रकाश देणे हाच त्याचा धर्म!
अगदी लहानपणापासून हा दिवा माणसाची सोबत करत असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिव्याची भूमिका बदलत राहते. जन्मतः नेत्रांचे दिवे लाभतात; पण त्यात दृष्टीज्योत नसेल तर पूर्ण जीवनात अंधार पसरतो.
तान्हुले बाळ घरी प्रवेशताना औक्षण करतात ती असतात निरंजने! मग बारशाला, जन्मदिवसाला निरंजनाच्या ज्योती जीवन तेजस्वी होण्यासाठी,प्रकाशमान होण्यासाठी तेवत ठेवतात. बहीण-भावाचा प्रेमळ सण रक्षाबंधनाला बहीणभावाचे औक्षण करून आयुष्य आणि आरोग्याची प्रार्थना करते.
लग्नानंतर संसार दिसागणी वाढावा आणि सुखाचा व्हावा म्हणून नवरा-नवरीचे औक्षण करतात. पाडव्याला, वटपौर्णिमेला पत्नी निरंजनाच्या ज्योतीसोबत प्रेमळ नजरेने पतीचे औक्षण करते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि तिच्या अखंड सौभाग्यासाठी!
आकाशातील चंद्र-सूर्य हे दोन्ही तेजस्वी तारे आणि लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्यारूपी पणत्या माणसास आयुष्यभर सोबत करतात, दिवसा अन् रात्री प्रकाशाची वाट दाखवत राहतात.
मग आयुष्याच्या संध्याकाळी होते साजरी एकषष्ठी, पंचाहत्तरी दिव्याच्या साथीने!
आणि इहलोक सोडून जाताना पण शेवटचे औक्षण होते मृत्यूच्या वाटेवर प्रकाश दाखवण्यासाठी! मृत्यूनंतरही दिवा तेवत राहतो… आत्मा तेजात विलीन होण्यासाठी आणि आत्म्यास शांती लाभण्यासाठी!
दिवा तोच असतो पण जीवनाच्या वाटेवर तो संदर्भ बदलत नेहमीच आपली सोबत करत राहतो… प्रकाशाची वाट दाखवत राहतो…
अंधारात चाचपडताना दिव्याची आठवण होते. रात्री अंधारात चालताना पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सुखावणारा असतो. सुख-दुःखात नेहमी दिवा सोबत असतो. दिव्याने दाखविलेला रस्ता कधीच चुकीचा ठरत नाही. कारण पुढे रस्ता खाचखळग्याचा आहे की, पक्का रस्ता आहे हे दिव्याच्या प्रकाशाने दिसले की पुढील मार्गक्रम करायला आपण मोकळे होतो. त्याचप्रकारे आपल्या अंतर्मनातील दिव्याच्या प्रकाशामुळे जीवनाची कोणती वाट योग्य आहे, हे समजते. त्यानुसार आपण आयुष्याच्या वाटेवर चालणे योग्य.