पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, तसेच निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सीव्हीजीएल हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांनी मागील तीन दिवसांत 46 तक्रारी नोंदविल्या आहेत.
या तक्रारींमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांचे पोस्टर-बॅनर काढले नाहीत. तसेच लोकप्रतिनिधींच्या घरांचा पत्ता तसेच कार्यालयाचा पत्ता दर्शविणे उल्लेख असणारे बोर्ड झाकले नाहीत, अशा स्वरुपाच्या आहेत. यातील 36 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. तर चार तक्रारींच्या ठिकाणांच्या लोकेशनची नीट माहिती दिली नसल्याने पत्ता सापडत नाही. तर सहा तक्रारी प्रलंबित असून लवकरच त्याचे निराकरण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी. तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नये. लोकसभा निवडणुकीत 100 टक्के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.
निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने आयोगाने सीव्हीजीएल हे अॅप आणले आहे. जिल्ह्यात दि. 16 मार्च 2024 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यापासून या अॅपद्वारे तक्रारी नोंदविता येत आहे. या अॅपद्वारे तक्रार नोंदविलेल्या नागरिकांची माहिती गोपनिय ठेवली जात आहे.
अशी करता येणार तक्रार
– नागरिकांनी मोबाइलमध्ये सीव्हीजीएल अॅप इन्स्टाॅल करावे
– या ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करावा
– मोबाइलमध्ये इंटरनेट आणि जीपीएस लोकेशन सुरू असणे आवश्यक
अशी केली जाते कार्यवाही
– अॅपवरून आचारसंहिता भंगाची माहिती दिल्यास ती जिल्हा प्रशासनाकडे येईल.
– जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार संबंधित लोकसभा मतदारसंघाकडील भरारी पथकाकडे पाठविते.
– पथक घटनास्थळी जाऊन कार्यवाही करत आहे.