– माधव विद्वांस
स्वातंत्र्यसैनिक आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा जन्म 20 जुलै 1919 रोजी नागपूर येथे झाला. स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू सुरेंद्र यांना घरातच मिळाले. त्यांचे शिक्षण एमए पर्यंत झाले होते. तत्त्वज्ञान विषय घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तसेच पीएच.डी. प्राप्त केली होती. त्यावेळी परीक्षक असलेले प्रो. डोरोथी इमेट यांनी उत्तम प्रबंध लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी अधिक संशोधनासाठी बारलिंगे यांची शिफारस प्रो. गिल्बर्ट राईल यांच्याकडे केली. त्यामुळे बारलिंगे यांना डॉक्टरेटोत्तर संशोधन छात्रवृत्ती मिळाली. त्यांनी आपला पीएच.डी.नंतरचा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठात केला. डॉ. बारलिंगे यांनी सामजिक व राजकीय चळवळींत भाग घेतला होता. त्यांनी भारताच्या वर्ष 1932 व 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता.
हैदराबादमुक्ती संग्रामातही त्यांनी 1947-48 दरम्यान भाग घेतला होता. वर्ष 1940 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सचिव होते. तसेच ते 1940-41 दरम्यान सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरर स्टुडंट्स फेडरेशनचे मुख्य सचिव होते. अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे व राष्ट्रीय युवक संघाचे ते एक संस्थापक आणि सहसचिव होते. शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता.
हैदराबादमुक्ती संग्राम संपल्यावर त्यांनी स्वतःला मराठवाड्यातील आणि तेलंगणातील शिक्षणक्षेत्राला वाहून घेतले. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची जडणघडण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या कॉलेजचे प्राचार्यपदही त्यांनी सांभाळले होते. तसेच ते आंध्र प्रदेशातील सिद्दीपेठच्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे, करीमनगरच्या एस. एस. आर. कॉलेजचे आणि हैदराबादमधील नूतन विद्या समितीच्या न्यू सायन्स कॉलेजचेही प्राचार्य होते.
अंमळनेरच्या भारतीय तत्त्वज्ञान संस्थेचे ते फेलो होते. या सर्वच काळातील त्यांच्या आठवणी आणि संवेदनशील मनाने टिपलेले जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव त्यांनी आपल्या ‘ओंजळभर पाणी’ या आत्मचरित्रात लिहिले आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठात, दिल्ली विद्यापीठात आणि त्यावेळी युगोस्लाव्हियात असणार्या व सध्या क्रोएशियाची राजधानी असलेल्या झाग्रेब शहरातील विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांची केवळ देशातच नाही तर ते युरोपादी पाश्चात्त्य राष्ट्रांत ‘भारतीय तत्त्वज्ञानावरील एक अधिकारी व्यक्ती’ म्हणून ओळख होती. त्यानिमित्ताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व युगोस्लाव्हिया या देशांमध्ये त्यांचे वास्तव्य झाले.
पुणे विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान विभाग सुरू केला. इंडियन फिलॉसॉफिकल, परामर्श (मराठी) आणि परामर्श (हिंदी) अशी तीन त्रैमासिके त्यांनी सुरू केली. तसेच तर्करेखा, सौंदर्याचे व्याकरण, आकाशाच्या सावल्या, इन्किलाब, ओंजळभर पाणी (आत्मकथन), खरा हा एकची धर्म, गोष्टींचे गाठोडे (कथासंग्रह), पुन्हा भेटू या (व्यक्तिचित्रे), माझा देश (कथासंग्रह), माझे घर (कथासंग्रह), मी पण माझे (कादंबरी) ही पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच त्यांची काही पुस्तके इंग्रजी व हिंदीतूनही प्रसिद्ध झाली आहेत.
19 डिसेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले.