– माधव विद्वांस
भारतातील एक प्रसिद्ध कायदेपंडित व स्वातंत्र्यलढ्यातील नेते भुलाभाई देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 रोजी गुजरातमधील बलसाड येथे झाला. भुलाभाईंचे वडील जीवनजी सरकारी वकील होते. सुरुवातीस त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. पुढे त्यांनी जमीनजुमला घेतला. बलसाडला घर बांधले व स्थायिक झाले. त्यांची आई रमाबाई धार्मिकवृत्तीची होती. भुलाभाईंचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. वर्ष 1895 मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एमए झाले (1901). त्यानंतर ते अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात प्राध्यापक झाले.
त्याअगोदर विद्यार्थीदशेतच इच्छाबेन या युवतीशी त्यांचे लग्न झाले.
त्यांना धिरूभाई नावाचा एकच मुलगा झाला. हे धिरूभाई देसाई कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पुढे ते भारताचे स्वित्झर्लंडमध्ये राजदूत झाले व तेथेच त्यांचे निधन झाले. अहमदाबादला असतानाच भुलाभाई एलएलबी झाले. त्यांनी मुंबईत वकिलीस सुरुवात केली व अल्पावधीतच तज्ज्ञ वकील म्हणून नाव कमावले. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व होते, अस्खलित वक्तव्य आणि वकिलीतील अशिलाची बाजू मांडण्याची हातोटी यामुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. कालांतराने मुंबई प्रांताचे ते ऍडव्होकेट जनरल झाले.
वकिलीबरोबरच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात भाग घेण्यास सुरुवात केली. होमरूल चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या असहकार चळवळीपासून ते अधिक सक्रिय झाले. वर्ष 1925 मध्ये ते ब्रूमफिल्ड समितीपुढे बार्डोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले. वर्ष 1931 मधे गांधी-आयर्विन कराराप्रमाणे बार्डोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली. वर्ष 1932 मधे त्यांना कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्ष शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड झाला. तुरुंगात त्यांची प्रकृती ढासळली. सुटका झाल्यावर ते वकिलीच्या काही कामानिमित्त इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी कॉंग्रेसतर्फे पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्यासाठी प्रयत्न केला. ते त्या बोर्डाचे सचिव व पुढे अध्यक्ष झाले. मध्यवर्ती कायदे मंडळात ते गुजरातमधून निवडून आले व विरोधी पक्षाचे नेते झाले. ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे काही वर्षे सभासद होते.
दुसरे महायुद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जे खटले झाले, त्यावेळी आझाद हिंद सेनेच्या बाजूने उभे राहिले. केसेस अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्या. शहानवाज, ढिल्लन आणि सहगल यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या खटल्यात त्यांनी आपले वकिली कौशल्य दाखवून दिले व मोठी कीर्ती मिळविली.भुलाभाईंनी लियाकत अलींबरोबर जातीय प्रश्नांबाबत एक करारही केला होता. पण कॉंग्रेस वर्किंग कमिटीने भुलाभाईंवर गांधीजींचा विचार न घेता हा करार केला, असा आरोप ठेवला व करार अंमलात आला नाही. पुढे हंगामी (इंटेरिम) मंत्रिमंडळातही भुलाभाईंचा समावेश केला नाही. शिवाय निवडणुकीसाठी त्यांचे नावही सुचविले नाही. यामुळे अखेरच्या दिवसांत त्यांची उपेक्षा झाली. अशा महान स्वातंत्र्यसैनिक व विधिज्ञाचे 6 मे 1946 रोजी मुंबई येथे निधन झाले.