लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार काल थांबला. आता तेथे केवळ दोनच टप्पे उरले आहेत. तथापि, बहुजन समाज पक्षाचा या निवडणुकीत प्रथमपासूनच प्रचाराचा फार जोर दिसला नाही.
पक्षाच्या नेत्या मायावती नेहमी प्रचार सभांचा धडाका लावतात, पण यावेळी मात्र त्यांच्या सभा तुलनेत कमी झाल्या आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसादही यथातथच होता. या लो-प्रोफाइल प्रचाराचे नेमके कारण शोधण्यात आता राजकीय विश्लेषक मग्न झाले आहेत. तथापि, बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, बसपाचा मतदार हा सायलेंट मतदार आहे. तो इकडे तिकडे हालत नाही, मायावतींवर त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे मायावतींना प्रचाराचा येथे झंजावात करण्याची गरज नाही.
हे काहीही असले तरी या निवडणुकीत बसपा फॅक्टर फार चालत नसल्याने भाजप विरोधी मतांमध्ये अपेक्षित फाटाफूट होत नाही हे पाहून पुन्हा भाजपची चिंता वाढली आहे. म्हणूनच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या पाच टप्प्यांतील प्रचारांमध्ये मायावतींच्या पक्षाला उचकवण्याचाही प्रयत्न करून पाहिला होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर बसपाच्या फारशा प्रभावी नसलेल्या वातावरणाचा लाभ कॉंग्रेसच्या प्रियंका गांधींना होणार का हा औत्स्युक्याचा विषय बनून राहिला आहे. उत्तरप्रदेशात मायावतींची स्वत:ची मतपेढी आहे, पण ही मतपेढी आजपर्यंत जो वेगळा पर्याय शोधत होती तो पर्याय त्यांना कॉंग्रेस मध्ये दिसू शकतो असे काहींचे म्हणणे आहे.
बहुजन समाज पक्षाचा पारंपारिक मतदार समाजवादी पक्षाकडे वळण्याची शक्यता कमी आहे. भाजपलाही हा मतदार सहजासहजी स्वीकारणार नाही, त्यामुळे याचा नैसर्गिक लाभ कॉंग्रेसला उठवता येऊ शकतो. त्यात ते कितपत यशस्वी होतात यावरही या निवडणुकीचे समिकरण अवलंबून असणार आहे.