नितीन राऊत
वडूज -यंदाच्या पावसाळ्यात येरळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने येरळा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर मोराळे गावच्या हद्दीत निमसोड व मायणीला जोडणारा पूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. या पुलाची उंची वाढवण्याची आवश्यकता असून तशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे; परंतु त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कलेढोण, मायणीहून औंध, रहिमतपूर, सातारा येथे जाण्यासाठी निमसोडमार्गे असलेला रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर आहे. पुसेगाव किंवा पुसेसावळीमार्गे साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यापेक्षा निमसोडमार्गे जाणारा रस्ता सध्या चांगल्या अवस्थेत असून व्यावसायिकदृष्टया या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर मोराळेनजीकच्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात येरळा नदीचे पाणी त्यावरून वाहते.
सध्या हा पूल बंद असल्याने म्हासुर्णेमार्गे मायणी किंवा वडूजमार्गे मायणी, असे 10 ते 15 किमी जास्त अंतर कापावे लागत आहे. हा पूल काही वर्षांपूर्वी वाहून गेला होता. त्यानंतर बांधलेल्या पुलाची उंचीही कमीच ठेवण्यात आली. सध्या नेर, येरळवाडी तलावासह खटाव, सिद्धेश्वर कुरोली, वडूज, कातरखटाव, पळसगाव या भागातून येणाऱ्या पाण्याने नदी व ओढ्यातील अनेक बंधारे भरून वाहू लागल्याने येरळा नदीपात्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा पूल आणखी काही दिवस पाण्याखालीच राहण्याची शक्यता असून त्याची उंची वाढवण्याची गरज आहे.
परिसरातील करोना रुग्णांसाठी मायणी हे एकमेव कोविड सेंटर व हॉस्पिटल आहे. या पुलावरूनच कोविड सेंटर व हॉस्पिटलला जावे लागते. त्यामुळे बांधकाम विभागाने या पुलाची उंची वाढवून जीवितहानी टाळावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुलाच्या कामी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
लोकांना जिवाची भीती
पुराच्या पाण्यातून हा पूल ओलांडताना म्हासुर्णेतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याची लोकांनी धास्ती घेतली असून या पुलाची उंची वाढवण्याची गरज आहे
प्रश्न कधी मार्गी लागणार?
परिसरातील लोकांना दरवर्षी या समस्येला तोंड द्यावे लागते. पुलाच्या बांधकामाच्या शुभारंभाचे नारळ अनेकदा फुटले तरी काम सुरू झालेच नाही. मायणीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
==================