पिण्यास व वापरास उपयुक्त नसल्याचा शासकीय विभागांचा अहवाल
पळसदेव-उजनी धरनातील पाणी सध्या कमालीचे दूषित झाले आहे. माणसांसह प्राणी, पक्षी व शेतीला देखील पाणी पिण्यास व वापरास उपयुक्त नाही, असा अहवाल यापूर्वी शासकीय विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठाकरे सरकार काय उपाययोजना करणार? याकडे पर्यावरण वाद्यांचे लक्ष लागून आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कारखान्यातून निघणारे दूषित पाणी प्रकिया न करता नदी पात्रात सोडल्यामुळे उजनीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. उन्हाळ्यात नदीतून पाणी नव्हे; तर गटारीत सांडपाणी व कारखान्यातून सोडलेले केमिकल वाहत असते. केवळ पावसाळ्यातील काही दिवसाचे नदीतून पाणी वाहत असतानाचे चित्र पाहावयास मिळते. वर्षानुवर्षे उद्योजकांनी आपल्या स्वार्थासाठी केवळ आर्थिक लाभापोटी दूषित पाणी प्रकिया न करता नदीपात्रात सोडल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. विशेष बाब म्हणजे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे यापूर्वीच जाणीवपूर्वक लक्ष दिले असते तर आज उजनीतील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित झाले नसते. या दूषित पाण्याला सर्वस्वी प्रदूषण मंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी पळसदेवचे माजी सरपंच अनिल खोत यांनी केली आहे.
या बाबत एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याचा अटीवर सांगितले की आम्ही अनेक वेळा कारवाई करण्यासाठी गेलो आता आमच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असतो. त्यामुळे आम्हाला पाणी दूषित करणाऱ्या उद्योजकांवर कारवाही करण्यास मोठा अडथळा येत आहे. मग आम्ही कारवाही कशी करणार?
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. उजनी काठावर बहुतेक कारखाने राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या जवळील नेते व कार्यकर्त्यांचे आहेत. त्यामुळे आता उजनीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई होण्याची शक्यता धूसर होणार आहे; मात्र सध्या दिवसेंदिवस पाणी महाग होत आहे. बोलले जात आहे की पुढील युद्ध हे पाण्यासाठी होईल. मग असह्य पद्धतीने वागून ही परिस्थिती लवकरच आपण ओढवून घेत आहोत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- ठाकरे सरकारकडून अपेक्षा
उजनी धरणाचे पाणी शुद्ध करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. उजनीचे पाणी दूषित झाले आहे म्हणून केवळ उजनी काठावरील गावात पाणी फिल्टर बसून चालणार नाही, तर उजनीचे पाणी दूषित होऊच नये यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. आता नुकतेच सत्तेत आलेले ठाकरे सरकार याबाबत काय उपाययोजना करणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.