कोपरगाव -मागील दोन महिन्यांपासून करोनाच्या भीतीने कोपरगावचा सराफ बाजार ओस पडला होता. सुवर्ण व्यावसायिक व त्यांच्यावर विसंबून असलेल्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली होती. दोन महिने ठप्प असलेली सोन्याची दुकाने काही अटी, शर्तींवर ठराविक दिवसांसाठी आठवड्यातून दोन दिवसांसाठी उघडण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने दिली. त्यानंतर येथील सराफ बाजारात सोने-चांदी खरेदी करण्यासाठी व सोने मोडतोड करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
केवळ दोन दिवसांतच शहराती 150 सराफी दुकानांतून अंदाजे 15 कोटींची उलाढाल झाल्याची माहीती सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. अडचणीच्या काळात जवळचे सोने कामाला येते, ही संकल्पना फार जुनी आहे. त्याचाच प्रत्येय या दोन दिवसांत आला. सराफ बाजारातील सर्व दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले तरी खरेदी-विक्रीचा उच्चांक वाढलेला दिसून आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही ही वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमती आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी (दि.15) सोन्याचा दर ऐतिहासिक 47 हजार 67 रुपये प्रतितोळा ऐवढा वाढला होता. आता त्यामध्ये 881 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा सोन्याचा दर 47 हजार 948 रुपये इतका झाला आहे.
सोमवारी (दि.18) सराफ बाजारात विक्रमी गर्दी झाली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सराफ बाजार उघडला आणि दुकाने सुरू होताच कोपरगावकरांनी एकच गर्दी केली. एकाच दिवसात अनेकांनी लाखो रुपयांचे सोने खरेदी केले. शहरातील सराफ बाजारात दोन दिवसांत तब्बल 15 कोटी पेक्षा जास्त उलाढाल झाली. सोन्याचे दर वाढले, तरी नगरिकांचा सोन्याचा मोह काही कमी झाला नाही. करोनामुळे दोन महिने नागरिक घरात बसून असल्याने सर्व व्यवहार बंद होते. आर्थिक उलाढाली बंद होत्या. अनेक आर्थिक आडचणी आल्या. दैनंदिनी व्यवहार बंद होते.
नागरिकांकडे पैसे नाहीत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढलेले, देशात आर्थिक स्थिती बिघडलेली. त्यामुळे प्रतिसाद मिळतो की नाही, या चिंतेत सराफी व्यवसाय करणारे होते. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, लोक सोने खरेदी करणार नाहीत, असे अंदाज अनेकांनी बांधले होते पण कोपरगावकरांनी ते सगळे अंदाज फोल ठरवत सोन्याची लयलूट केली. शेअर्स बाजारात होणारे कमालीचे चढ-उतार, बाजारपेठेतील मंदीची परिस्थिती, बॅंकांच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बॅंकांबाबत निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना, तसेच लग्नसराईच्या मोसमामध्ये सोने खरेदीचा विचार, यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याची माहिती कोपरगाव सुवर्ण व्यावसायिक नीलेश उदावंत यांनी दिली.
येत्या काळात पुन्हा सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. करोनाचा परिणाम जागतिक सोने बाजारावर झाला असून, बाहेरच्या देशांतून येणारे सोने, प्रवास बंदी व इतर कारणांमुळे भारताच्या बाजारपेठेत अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बसणार आहे, असेही ते म्हणाले. सध्यातरी नागरिक सोन्याच्या मोहात आहेत, हे दोन दिवसांच्या गर्दीवरुन व झालेल्या उलाढालीवरून स्पष्ट होते.