नवी दिल्ली – मालदीवसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकार लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ बांधण्याचा विचार करत आहे. या विमानतळाच्या निर्मितीमुळे लक्षद्वीपमधील पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे नवीन विमानतळ नागरी आणि लष्करी उद्देशासाठी असेल आणि नागरी विमानांसोबतच लष्करी विमानेही येथून चालवता येतील.
मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्तावही सरकारने यापूर्वी दिला होता. मात्र आता हा प्रस्ताव बदलून संयुक्त विमानतळ म्हणून विकसित करण्याची तयारी सुरू आहे. लष्कराच्या दृष्टीकोनातून, नवीन विमानतळाच्या बांधकामामुळे भारताला आरबी समुद्र आणि हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
भारतीय तटरक्षक दलाने याआधी मिनिकॉय बेटावर हवाई पट्टी बांधण्याची सूचना सरकारला केली होती, परंतु आता ताज्या प्रस्तावात भारतीय हवाई दलाला येथे मोठे ऑपरेशन दिले जाणार आहे.
मिनिकॉयमध्ये विमानतळ बांधल्याने लक्षद्वीपमधील पर्यटनालाही चालना मिळेल. सध्या, लक्षद्वीपमधील अगाट्टी बेटावर एक हवाई पट्टी आहे, परंतु त्या पट्टीवर सर्व प्रकारची विमाने चालु शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यापासून हा केंद्रशासित प्रदेशही चर्चेत आहे.