नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून ग्रामस्थांना दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली आहे. वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अंतिम संस्कार करण्यासाठी ३ ते ४ फुट खोल नदी नाल्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. मरणानंतरही यातना सुरुच असल्याचे या गावातील घटनेनंतर समोर येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदे गावातील धावजी उखाराव नाईक यांचा ८ तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यावेळी त्यांची अंत्ययात्रा चक्क वाहत्या नाल्यातून घेऊन जावी लागली. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे येथील नदी नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे.
वागदे गावाजवळ असलेल्या नाल्यात देखील पावसाच्या पाण्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे १५तासांनंतर शनिवारी पाण्याच्या जोर कमी झाल्याने ग्रामस्थांनी नाल्यातून चार फूट खोल पाण्यातून दोराच्या साहाय्याने अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये नेली. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात १९८ ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी आहेत. तर ४४० ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर नवापूर तालुक्यात ११६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २१ ग्रामपंचायतीत स्मशानभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांना धावजी नाईक यांची अंत्ययात्रा नेण्यासाठी नाल्यातून दोर लावून जावे लागले. यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नवापूर तालुक्यातून ग्रामस्थ करत आहेत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या होत्या.