फार्ससम्राट, प्रसिद्ध रंगकर्मी, नाट्यचित्र अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 7 मे 1923 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथे झाला. कोकणातील लोक मुळातच नाट्यप्रेमी त्यामुळे कोकणच्या भूमीने अनेक नामवंत अभिनेते दिले. कोकणातील पारंपरिक दशावतारी नाटकामुळे आत्माराम भेंडे यांच्यावर संस्कार झाले.अनेक नाट्य कंपन्या त्यांच्या घराशेजारी उतरत असत. त्यामुळे त्यांना नाटकांचे मोफत पास मिळत. साहजिकच ते नाट्यप्रेमी झाले. शाळेच्या वार्षिकोत्सवात पन्हाळगडाचा किल्लेदार या नाटकात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली.
शालेय शिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी प्रथम शिक्षणावरच भर दिला. वर्ष 1945 मध्ये व्हीजेटीआयमधून वस्त्रोद्योग अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्याच सुमारास त्यांना आठवड्यातून एकदा रेडिओवर काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळेस त्यांना एका कार्यक्रमाचे 5 रुपये मिळत होते. त्यांचे मित्र शंकर आडिवरेकर हे इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी)च्या मराठी विभागाचे प्रमुख होते. आडिवरेकर आणि नाटककार माधव मनोहर यांनी त्यांना “सशाची शिंगे’ या नाटकात भूमिका दिली. मराठी नाट्यसृष्टीत विनोदी “फार्स’ हा प्रकार बबन प्रभू व आत्माराम यांनी रंगभूमीवर आणला. बबन प्रभू यांनी लिहिलेल्या “झोपी गेलेला जागा झाला’ हा फार्स आत्माराम भेंडे यांच्या अभिनयामुळे रंगभूमीवर खूपच लोकप्रिय झाला. त्या नंतर त्यांची अभिनयाची कारकीर्द बहरात आली. कारकीर्द रंगभूमीवर वेगाने बहरली.
“विठोबा झाओबा आणि केशवराव दाते हे माझे गुरू. त्यांच्याकडून मला प्रत्यक्ष शिकायला मिळाले नाही, तरी त्यांच्या अभिनयातून, निरीक्षणातून मी नाटकातील प्रत्येक गोष्ट शिकत गेलो, असे आत्माराम नेहमी म्हणत. चेहऱ्यावरचे हावभाव, योग्य वेळी योग्य शब्दांची शब्दफेक करून विनोद निर्माण करण्याची त्यांची हातोटी होती. दिनूच्या सासूबाई राधाबाई, पिलूचं लग्न ही त्यांची नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती.
मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा अनेक नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर पाडली होती. त्यांच्या फार्समधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले. “एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते’ म्हणून त्यांनी रंगभूमीवर आपले स्थान अधोरेखित केले. रंगभूमी, हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपट, जाहिराती, दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी आपला अभिनय सहज साकारला. तसेच दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती. आपल्या वयोमानाप्रमाणे साजेशा भूमिका साकारल्या. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी नाटकांमधूनही भेडेंनी अभिनय वठविला.
वर्ष 1981 मध्ये नाशिकला झालेल्या 61 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भेंडेंनी भूषवलं होतं. त्यांना 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित केले. आत्माराम यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे 7 फेब्रुवारी 2015 रोजी निधन झाले.