लाखो रुपयांचा खर्च वाया; चौका-चौकात यंत्रणा धूळखात पडून
कराड (प्रतिनिधी) -कराड नगरपालिकेने गत चार वर्षांपूर्वी शहरात “वाय-फाय’ सुविधा उपलब्ध केली होती. युवा पिढी व व्यावसायिक यांना याचा फायदा व्हावा या हेतूने ही सुविधा सुरू करण्याचा पालिकेचा मनोदय होता. सध्या या सुविधेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहेत. दराच्या विषयावरून व टेंडरवरून ही योजना सुरू होण्याआधीच बंद पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून या योजनेसाठी घातलेला लाखो रूपयांचा निधी वाया गेला असून यंत्रणा धूळखात पडल्याचे दिसत आहे.
तीन महिने मोफत देण्यात येणारी “वाय-फाय’ची सुविधा पालिकेने चार वर्षांपूर्वी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ते आजतागायत पूर्ण केलेले नाही. सुरूवातीला वायफाय सुविधा होणार म्हटलं की कराडकरांचा आनंद द्विगुणित झाला होता. पालिकेने सुरूवातीला एक महिनाभर वायफाय सुविधेचा उपभोग कराडकरांना घेऊ दिला. मात्र, त्यानंतर हे प्रकरण नगरसेवकांमध्ये वादावादीचं ठरलं ते आजही आहे. या सुविधेबाबत विचारले असता फारस कोणी बोलायला तयार होत नाही. सुविधा खर्च आणि वीज बिलाच्या प्रकरणात हे वाय फाय यंत्र गेल्या चार वर्षांपासून शहरातील चौका-चौकात धुळखात उभे आहे.
दत्त चौक, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी तसेच पंचायत समिती कार्यालय परिसर येथे वायफाय सेवा बसविण्यात आली आहे. ही सुविधा सुरू केली तेव्हा युवा पिढीत आनंदीआनंद होता. मात्र, तीन महिने फुकट अन् त्यानंतर दररोज वीस मिनिटे फुकट असे सांगणाऱ्या कंपनी व पालिकेने ही सेवा अवघ्या काही दिवसांतच बंद केली.
पालिकेने मागविलेली माहिती कंपनीकडून योग्य वेळी दिली गेली नसल्याने तसेच वायफायमधील अनेक अपूर्ण राहिलेल्या गोष्टींमुळे या सुविधेस सुरूवातीपासूनच विरोध होऊ लागला. अखेर तत्कालिन विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित पालिकेच्या योजनेची जोपर्यंत चौकशी व योग्य अंमलबजावणी होत नाही.
तोपर्यंत ही योजना तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी 18 जानेवारी 2016 रोजी दिले. त्यापासून आजतागायत ही सुविधा पुढे सुरू व्हावी, म्हणून कुणीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे आता चार वर्षे झाली तरी शहरात अजून पालिकेची वायफाय सुविधा बंद अवस्थेत आहे. शहरातील चौकांमध्ये सुविधेचे यंत्र मात्र या योजनेची कराडकरांना आठवण करून देत उभे आहेत.