मुंबई – मुंबईमध्ये आणि राज्यभर फिरतोय, हे पाहण्यासाठी की तुम्ही जागे आहात की नाही. कारण आपल्याला हुकूमशाही गाडायची आहे. ज्या पद्धतीने भाडोत्री जनता पक्ष म्हणजे भाजपा. हे मी एवढ्यासाठी बोलतोय कारण त्यांच्याकडे ओरिजनल नेते राहिलेलेच नाही आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत ईडीची कारवाई सुरू असलेले जोगेश्वरी मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर हेही उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपची हालाखिची परिस्थिती, त्यांना उमेदवारही बाहेरून आणावा लागतो आहे. ते भलेही म्हणो तितके पार आणि तितके पार, पण या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले आहेत. आता त्यांची परिस्थिती एवढी हालाखिची आहे की, त्यांना उमेदवारही बाहेरून आणायला लागत आहेत.
आठवड्याभरापूर्वी त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बेहिशेबी मालमत्ता असलेल्या कृपाशंकर सिंह यांचेही नाव आहे, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचे नाव नाही.
विशेष म्हणजे गेल्या लोकसभेला ज्योतिरादित्य शिंदे यांना पाडण्यासाठी काँग्रेसमधून एक नेता भाजपाने घेतला होता. तो निवडून आला होता. पण आता त्याच तिकीट कापून पुन्हा ज्योतिरादित्य शिंदे यांना देत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.