- प्रशासनाने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला
वडगाव मावळ – करोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात “कम्युनिटी किचन’साठी शासनाच्या वतीने शेकडो टन गहू व तांदूळ एप्रिल महिन्यापासून उपलब्ध करण्यात आला. मावळ तालुक्यातील मंडलाधिकारी कार्यक्षेत्रात “कम्युनिटी किचन’ उभारण्याचे आदेश दिले होते. पण “कम्युनिटी किचन’चा शेकडो टन गहू व तांदूळ मागील पाच महिन्यांपासून मावळ तहसील कार्यालयाजवळील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाच्या जिमखान्यामध्ये ठेवलेले आहे. या धान्याचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.
“कम्युनिटी किचन’साठीचे असलेल्या धान्याचा वापर न करता तसेच साठवणूक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील गरीब, गरजू कुटुंबाचा रोजगार बंद झाला. हातावरचे पोट असलेल्या कुटुंबाला शासनाच्या वतीने “कम्युनिटी किचन’ योजनेअंतर्गत अन्न देण्यासाठी गहू व तांदूळ उपलब्ध करण्यात आला. पण मावळ तहसील कार्यालयाच्या वतीने शासनाचे शेकडो टन गहू व तांदूळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाच्या जिमखान्यामध्ये एप्रिल महिन्यापासून पडून आहे. हे धान्य पाच महिन्यांपासून पडून असल्याने उंदिर व घुशीने नासाडी केली आहे.
पावसाळा सुरू झाला असून, काही धान्य भिजले आहे. गरीब व गरजू कुटुंबाला सद्यस्थितीत गहू व तांदूळ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच मावळ तालुक्याच्या शिधापुरवठा कार्यालयाचा फलक नसल्याने नागरिकांची दिशाभूल होत आहे. या धान्याविषयी चौकशी केली असता ते धान्य “कम्युनिटी किचन’साठीचे असून, ते कोणालाही वाटप करता येत नाही, असे बोलले जात आहे. पण ते धान्य काही दिवस राहिले तर ते खाण्यायोग्य राहणार नाही.
गरीब व गरजूंच्या हक्काचे धान्य वितरण होण्यासाठी त्यांना मोर्चा काढावा लागतो. त्यांच्या हक्काच्या धान्याला कीड लागते. काही धान्य पावसाच्या पाण्याने कुजत आहे. “कम्युनिटी किचन’चे धान्य मागील पाच महिन्यांपासून वाटप न करता ते तसेच ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक गणेश काकडे, रमेश भुरुक, सोमा भेगडे, हरीश दानवे, शरद मोरे व नागरिकांनी केली.
“कम्युनिटी किचन’चे धान्य तहसील कार्यालयात ठेवले गेले. इकडे सामाजिक संस्थांनी धान्य नसल्याने सुरू केलेले अन्नछत्र बंद केले. पाच महिन्यांपासून धान्य ठेवले जात असून, त्या धान्याची देखभाल केली नाही. गरीब, गरजूंच्या हक्काच्या धान्याचे नुकसान झाले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
– किशोर आवारे, सामाजिक कार्यकर्तेमावळ तालुक्यातील मंडलाधिकारी कार्यक्षेत्रात करोनाच्या पार्श्वभूमीवर “कम्युनिटी किचन’ सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने गहू व तांदूळ उपलब्ध झाला. पण “कम्युनिटी किचन’ सुरू करण्यासाठी मसाला उपलब्ध झाला नाही. हे धान्य पुरवठा विभागाला घेऊन जाण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे.
– रावसाहेब चाटे, नायब तहसीलदार, मावळ.