पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रत्येकात एक कवी लपलेला असतो, त्याचा शोध घेता आला पाहिजे. आजूबाजूच्या घडामोडींचा, वास्तवाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे भाव सहज कवितेतून उमटतात. कविता स्वतः जगते आणि कवी व कवयित्रीला जगवते, असे मत कवी म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
तितिक्षा इंटनॅशनलच्या वतीने कथा लेखणीची..प्रचिती संस्कृतीची’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहजारोग्य साहित्यिक, सांस्कृतिक अभियानांतर्गत आयोजित काव्य करडंक स्पर्धा २०२४ मध्ये ते बोलत होते. या वेळी मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिती पुंडे, काकडे देशमुख शिक्षणसंस्थेचे प्रमुख शरदचंद्र काकडे देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक वि. ग. सातपुते, नाट्यदिग्दर्शक सतीश इंदापूरकर, बाबा ठाकूर, अॅड. रवींद्र भवार, सुजित दातार आणि सिनेकलाकार चेतन चावडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम क्रमांक बालकवी मृण्मयी काळे हिने पटकविला. द्वितीय पल्लवी पवार आणि गणपत तरंगे व महादेव लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले, तसेच विवेकानंद काव्यलेखन स्पर्धा, तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव पुरस्कार, तितिक्षा माई गौरव पुरस्कार, तितिक्षा अमृत गौरव, तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मिसेस यश वालिया, कलावती सुर्वे, अंजली महाजन, प्रियंका बोरकर, सुनीता मुरलीधरन, सुपर्णा वाबळे, आरती केरकर आदी महिलांना नारी सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्याचप्रमाणे चेतन चावडा यांना ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार २०२४’ ने गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सुवर्णा जाधव व योगेश हरणे यांनी केले.