Rohit Pawar : तरुणांचे, बेरोजगारीचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची युवा संघर्ष यात्रा (Yuva sangharsh yatra ) निघाली होती. पुण्याहून नागपूरपर्यंत ही यात्रा दाखल झाली होती. मात्र युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेनंतर मंगळवारी नागपुरात राडा झाला. सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते. मात्र, सभा संपल्यानंतरही कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह विधानभवनाकडे कूच केले.
या गोंधळानंतर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यात झटापट झाली. लाठीचार्जनंतर कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार विधिमंडळात त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि #युवा_संघर्ष_यात्रेत ८०० कि.मी. चालत असताना भेटलेल्या लाखो लोकांनी आणि संघटनांनी मांडलेल्या अडचणी आणि समस्यांचं निवेदन दिलं. #YuvaSangharshYatra pic.twitter.com/wyO4p75zdG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2023
अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना युवा संघर्ष यात्रेतील मागण्यांचे निवेदन दिले. नागपूर विधिमंडळात रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ८०० किमी चालत काढलेल्या संघर्ष यात्रेत भेटलेल्या युवकांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे आणि मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले.
युवा आणि जनतेच्या या मुद्द्यांवर या अधिवेशनात निर्णय घेतला तर आमच्यावर झालेला लाठीचार्ज आम्ही नक्कीच विसरून जाऊ… @mieknathshinde @Jayant_R_Patil @AnilDeshmukhNCP @Awhadspeaks@rohitrrpatilncp #YuvaSangharshYatra pic.twitter.com/4d8MMwfE9K
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2023
याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘निवेदनातील सर्व मुद्दे हे वस्तूनिष्ठ आणि अत्यंत महत्त्वाचे असून यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्री महोदयांना केली. यावर याच अधिवेशनात निर्णय घेण्याबाबत त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, युवा आणि जनतेच्या या मुद्द्यांवर या अधिवेशनात निर्णय घेतला तर आमच्यावर झालेला लाठीचार्ज आम्ही नक्कीच विसरून जाऊ,’ असेही आमदार पवार यांनी ट्वीट (एक्स) करत म्हंटले आहे.