राहुरी – तालुक्यातील उंबरे येथील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर प्रकरणा विरोध करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करून अटक झाली. यातील प्रतीक धनवटे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली असा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत केला.
जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बुधवारी दि.2 रोजी सकाळी विधानभवनात आ. नितेश राणे यांची भेट घेऊन उंबरे येथील प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर दुपारी विधानसभेत आ. नितेश राणे यांनी उंबरे येथील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर प्रकरणी या मुलींना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे, परंतु यावेळी यातील प्रतिक धनवटे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण संबंधित ठिकाणी जाऊन आलो असून जर यामध्ये युवकांना मारहाण झाली असेल तर यामध्ये दोषींवर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, उंबरे येथील प्रकरणी विधानसभेत आ. नितेश राणे यांनी व आधी विधानपरिषदेत आ. प्रसाद लाड यांनी आवाज उठविल्याने ग्रामस्थांनी या प्रकरणी निर्णायक भूमिका घेतल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानले आहेत.