वाघोली (पुणे) – शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता हि पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. आपले घर, प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास, आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी,समाजातील गोरगरीब, वंचितांच्या प्रश्नांसाठी दिला पाहिजे. मक्याच्या एका दाण्याला पहिले स्वतःला गाडून घ्यावे लागते. नंतरचं त्याचे भरदार कणीस तयार होते. त्याचप्रमाणे माहिती सेवा समितीचे कार्य प्रशंसनीय आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक,पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या माहिती अधिकार कायदा कार्यकर्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी अण्णांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा व इतर काही कायदे वेळोवेळी सरकारला जागे करुन व जनआंदोलन करुन जनतेच्या हितासाठी पारित केले. सहा मंत्री व अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवले हे मी कायदा व न्यायव्यवस्थेद्वारे करु शकलो. कायद्यात ऐवढी ताकद आहे, की तुम्ही ही कायद्याच्या अधारे असे काम करु शकता.
यावेळी दुपारच्या दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायदा, कायद्याची रचना व माहिती, विविध कलमे, अर्ज कसा करावा पासून अपिल कसे करावे याबाबत माहिती दिली. प्रशांत देशमुख, राजेंद्र नाणकर व चंद्रकांत वारघडे यांनी सहभागी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.