पुरंदरच्या दक्षिणेकडील गावांत पीकं, फळबागांचे नुकसान
परिंचे- पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातून उत्पन्न मिळेल या भाबड्या आशेवर उसनवारी करून खरीपाची पेरणी केली. सुरवातीच्या काळात पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने पिके जोमदार आली त्यामुळे आणखी कर्ज काढून पिकांची खुरपणी व खतपाणी करून पिके हाताशी आणली आणि होत्याच नव्हत झालं. अतिवृष्टी झाली त्या पाठोपाठ अवकाळीचा तडाखा बसल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकरी रविंद्र जाधव यांनी व्यक्त केली. रब्बीच्या पिकासाठी घेतलेलं कर्ज फेडणार कसं, खरीपासाठी भांडवल आणायचं कसं, संसार चालवायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना आता भेडसावत आहेत.
परिंचे (ता. पुरंदर) येथेही पावसाने मोठे नुकसान झाले असून काढणी अवस्थेत आलेले दोन एकर सोयाबीन पाण्यात आहे. काढलेली एक एकर बाजरी पाण्यात असून कणसांना मोड फुटले आहेत. भुईमूगाच्या शेंगा पाण्यात राहून कुजल्या आहेत.चालु वर्षातील मुठभर सुध्दा धान्य घरी गेले नाही. वर्षभर खायचे काय? असा प्रश्न शेतकरी कुटुंबांना पडला आहे. येथील सुरेश जाधव, तानाजी जाधव, रोहिदास जाधव, संजय जाधव आदी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण शिवार पाण्याखाली असून प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे. पाऊस उघडला तरी एक महिना शेतात वापसा होणार नसल्याने रब्बीची पेरणी करायची तरी कशी, असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शासनाकडून मदत मिळणार तरी किती आणि तुटपुंज्या मदतीचे करायचे तरी काय, यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पुरंदर मधील सिताफळ, डाळींब, अंजीर या फळबागांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे सिताफळे काळी पडली आहेत. झाडे सारखी पाण्यात असल्यामुळे फळ उकलली आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सिताफळ लहान आकाराची झाली असून तीन एकर क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसला असून दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी हनुमंत सोळसकर यांनी सांगितले.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात मांढर, काळदरी परिसरात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे भात पिका बरोबर खाचरे वाहून गेली असून मोठ्या ताली पडल्या आहेत. जमीन वाहून झालेले नुकसान कधीही भरून निघणार नसल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला असल्याचे मांढर गावचे सरपंच सचिन शिंदे यांनी सांगितले. भाताचे पीक काढणी अवस्थेत आहे, अशा परिस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी साठून राहिल्यामुळे पिके सडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे तसेच शासनाने तातडीने या परिसरातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काळदरी गावचे उपसरपंच अंकुश परखंडे यांनी केली आहे.