मुंबई – ज्यांच्याकडून घेतले, त्यांच्या मिठाला जागले पाहिजे. नैतिकता यालाच म्हणतात, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाला जाण्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे. शिरसाट यांच्यासह मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना जलसंधारण मंत्रिपद मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गडाख ठाकरेंसोबत राहिले. आता उद्धव ठाकरे यशवंतरावांच्या वाढदिवसाला गेलेत. हा सारा घटनाक्रम पाहता संजय शिरसाट यांनी टोलेबाजी केली आहे.
शिरसाट पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतःला तत्त्वज्ञानी समजतात. ते नैतिकतेच्या गप्पा मारतात. नैतिकतेमुळे राजीनामा दिल्याचे म्हणतात. त्यांनी यशवंतराव गडाखांच्या वाढदिवसाला जाणार असल्याचे सांगितले. यालाच नैतिकता म्हणतात. ज्यांच्याकडून घेतले, त्यांच्या मिठाला जागले पाहिजे, असे म्हणत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
शिरसाट म्हणाले की, आमचा सावंत नावाचा सहकारी बांद्रयात कॅन्सरने मेला. तुमच्या दहा मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण होते. तुम्ही कितीदा जाऊन भेटलात. यामिनी जाधव आमदार आहेत. तुम्ही त्यांना कितीवेळा भेटायला गेला, हे सांगितले पाहिजे. माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा, हे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव किंवा आदित्य नाही. वडिलांनी पाहिलेले स्वप्न. ती जबाबदारी पार पाडली असती, तर त्याला नैतिकता म्हणतात, असे अनेक टोले त्यांनी यावेळी हाणले.
सल्लागारांनी केले वाटोळे…
प्रेसमध्ये त्यांना काय बोलायचे कळत नव्हते. सल्लागारांनी त्यांचे वाटोळे केले. ते त्यांना फीड करत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया द्यायच्या नसतात, ही नैतिकता आहे. त्या निकालाचे अवलोकन करायचे असते. त्यावर मार्ग काढायचा असतो. तुमच्याकडे आलेल्या लोकांचा प्रवास का सांगत नाही. भास्कर जाधव यांचा प्रवास का सांगत नाही. सचिनचा प्रवास का सांगत नाही.
बाकी इतरही काही लोक आले आहेत. त्यांचाही प्रवास का सांगत नाही. परंतु आपले झाकून टेवायचे. गिरे भी तो टांग उपर…ही तुमची अवस्था आहे. पंधरा दिवसांचा वेळ द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही भाजप-शिवसेनेची मते घेऊन जिंकून आलात. हे पाहता आमच्यात नैतिकता आहे. तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला सांगा, असे आव्हान त्यांनी दिले.