कोपरगाव – कोपरगाव येथील एका हिंदू युवतीवर अत्याचार करुन तिला धर्मांतर करण्याची जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामुळे सकल हिंदु समाजातर्फे कोपरगाव येथे दि. 20 जुलै रोजी जनआक्रोश मोर्चा निघणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दक्ष झाले आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणेचे या मोर्चावर लक्ष केंद्रीत केल्याने दोन दिवस अगोदर पासूनच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगावमध्ये तळ ठोकला. तसेच दिवसरात्र करडी नजर ठेवून पोलीस शहरात व तालुक्यात गस्त घालत आहेत.
या मोर्चातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. दि. 20 जुलै रोजी जन आक्रोश मोर्चा असला तरी पोलीस विभागाने आजपासून तयारी केली आहे. दि. 19 जूलै रोजीच कोपरगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरुप येणार आहे. शेकडो पोलिसांच्या तुकड्या शहरात दाखल होणार असल्याने येत्या काळात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी व्यवस्था जिल्हा पोलीस प्रशासनाने केली आहे. तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या तुकड्या दिसणार असल्याने कोपरगावच्या मोर्चाकडे संपूर्ण पोलीस यंत्रणा व शासकीय यंत्रण बारीक लक्ष ठेवून आहे.