संगमनेर – गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरूअसलेल्या चोऱ्यांचा तपास लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. त्यांच्या या शोध मोहिमेला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास 112 क्रमांकावर आलेल्या फोन कॉलमुळे यश आले. दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ जणांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ही टोळी संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध गावांतील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठार भागातील साकूर व पारनेरला जोडणाऱ्या पानोडी- वरवंडी या दरम्यानच्या घाट रस्त्यावर मालवाहतुकीचा टेम्पो (एमएच १७ सीव्ही १०८४ ) व त्यासोबत सुमारे नऊजण रस्त्याच्या कडेला गुन्हा करण्याच्या इराद्याने दबा धरून बसल्याची माहिती जागरूक नागरिक नितीन बाळासाहेब गायकवाड यांनी दिली. पोलिसांनी तातडीने या माहितीची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले असता, त्यांना ही माहिती सत्य असल्याचे आढळले.
त्यामुळे पोलिसांनी हालचाली करून तेथे आढळलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरू मुळेकर व एक अल्पवयीन आरोपी (सर्व रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) यांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यासोबत सिद्धू मकवाने (रा.दाढ बुद्रुक,) कदिर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व शरद उर्फ गोटया हरिभाऊ पर्वत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व इतर तीन अज्ञात असे एकूण नऊ आरोपी या टोळीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचा मालवाहतुकीचा टेम्पो, लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड, दोरी व मिरची पावडर असा साहित्य साठा जप्त केला आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पानोडी घाट रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणारे वाटसरू यांची लुटमार तसेच दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. याप्रकरणी इतर सहा आरोपी निष्पन्न झाले असून, ते फरार झाले आहे. सहाय्यक फौजदार बाबासाहेब पाटोळे यांनी आश्र्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.