राहुरी – निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची कामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी तालुक्यातील तांभेरे गावातील श्रीराम मंदिरात निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आज (सोमवार) महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले. परिसरातील लाभधारकांनी या उपोषणास पाठिंबा दिला.
निळवंडे धरणावर 182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे, प्रस्तावित कालव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, डावे आणि उजवे कालवे बंदिस्तऐवजी उघड्या पद्धतीने करावेत अशा मागण्यांसाठी पवार यांनी उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून प्रश्न मार्गी लावावा, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. निळवंडे कालव्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मोरे यांनी दिला. मागील महिन्यात याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी अधिकाऱ्यांनी एका महिन्यात कालव्याची कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही, असेही मोरे यांनी सांगितले.
या वेळी निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, राधुजी राऊत, संजय येलम, नितीन गागरे, सुधाकर मुसमाडे, गणेश मुसमाडे, सचिन मुसमाडे, मारुती कदम, अशोक जोशी, बाबासाहेब पठारे, सोमनाथ नरवडे, तुषार पठारे, जयराम गीते, नितीन नरोडे, राजेंद्र नालकर, बापू चोथे, दीपक वैरागर, शिवाजी पठारे, अनिल राऊत, गणेश मुसमाडे, आबा पानसंबळ आदींसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.