तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .शरद पवार यांच्या शिरूर येथील सभेमुळे शिरूरचे वातावरण ढवळून निघाले आहे .शिरूर तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु राष्ट्रवादीचा दोन गटात विभागल्याने तालुका नक्की कोणाचा, असा प्रश्न जानकार मतदारांना पडला आहे. गेल्या महिन्यांपासून आरोप- प्रत्यारोपाची राळ उठल्यानंतर आता शिरूरच्या आखाड्यात प्रचार तोफा थंडावल्या आहेत.
निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवीत आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून शिरुर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. दोन्ही बाजूंनी दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. विकासकामांबाबत आरोप प्रत्यारोप झाले.
शिरूर लोकसभामधील ६ विधानसभापैकी १ विधानसभा आमदार शरद पवार यांच्या पाठीशी आहे. पाच आमदार हे अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. परंतु शिरूर तालुक्यात शरद पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याचे सोशल मीडियावर दिसून येते. त्यामुळे शिरूरची लढत रंगतदार होणार आहे.
बारामती लोकसभा प्रचाराची सांगता सभेच्या नंतर शरद पवार यांची तब्बेत बिघडल्यामुळे पुढील नियोजित सभेसाठी पवार उपस्थित राहतील का नाही याची काळजी शिरूरच्या कार्यकर्त्यांना लागली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे पुन्हा डायरेक्ट शिरूरच्या मैदानात उतरले. त्यामुळे पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिरूरच्या मैदानात गर्दी केली होती. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. सत्तेचा वापर करणे हे मोदींची खासियत आहे.
लोकशाहीने दिलेले मत त्यांना सहन होत नाही. ही वाटचाल हुकूमशाहीकडे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरमधून केले. जे देशाच्या हिताचे नाही. ज्या लोकशाहीवर विचारधारेचा विश्वास नाही. अशा विचारसरणीबरोबर मी आणि उद्धव ठाकरे कदापि बरोबर जाणार नाही, असे पवार यांनी शिरूरच्या सभेत सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्हावरे येथील प्रचार सभेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांना चॅलेंजच दिले. त्यामुळे शिरूरची लढत चांगलीच रंगात आली आहे. दोन्ही बाजूंनी दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. शनिवारी (दि.११) रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार तोफा थंडावल्या.
बारामतीसारखी शिरूरमध्येही मोठी उलाढाल
बारामतीबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघही पवार कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. शिरूरमध्ये प्रतिष्ठा व वर्चस्व राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दोन्ही गटाकडून अथक प्रयत्न सुरु आहे. बारामतीमध्ये निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे. तशीच चर्चा शिरूरमध्ये आर्थिक उलाढाल होती की काय, अशी आहे.