नवी दिल्ली – अयोध्येतील नव्याने निर्माण केल्या गेलेल्या प्रभू श्रीराम मंदिर उदघाटन सोहळ्याला येण्याचे आमंत्रण देशभरातील विशेष व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा असलेले नेते विनय कटियार यांना अद्याप आमंत्रण देण्यात आलेले नसल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे कटियार हे स्वत: अयोध्येतच वास्तव्याला असतात.
श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे मुख्य कार्यालय अयोध्येतच आहे. संपूर्ण सोहळ्याची तयारी येथूनच सुरू आहे. असे असूनही ट्रस्टच्या एकाही व्यक्तीने किंवा सदस्याने औपचारिकपणे या सोहळ्यात सहभागी होण्याच्या संदर्भात कटियार यांच्याशी संपर्क साधलेला नाही. आंदोलनाचा एक प्रमुख आणि सगळ्यांत मोठ्या चेहऱ्याचेच विस्मरण होणे ही सगळ्यांनाच चकित करणारी घटना आहे. अर्थात राम जन्मभूमी आंदोलनाचा अन्य प्रमुख चेहरा असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले असून त्या १८ जानेवारी रोजी सकाळीच अयोध्येत दाखल होणार आहेत.
विनय कटियार यांच्या निकटच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार कटियार हे आंदोलनाचा प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा होते. पण त्यांच्याशी औपचारिकपणे अजुनही कोणी संपर्क साधलेला नाही. बजरंग दलाचे संस्थापक अशी कटियार यांची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच विश्व हिंदु परिषदेची मोठी आंदोलने होत असतात.
कटियार यांना खरेच आमंत्रण देण्यात आले नाही का असा प्रश्न एका राष्ट्रीय माध्यमाच्या प्रतिनिधीने विश्व हिंदु परिषदेच्या नेत्याला विचारल्यावर विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, कार्यक्रमासाठी पाहुण्यांना आमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजुनही अनेक जणांना निमंत्रण दिले जाते आहे. या महिन्यातही ती प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे कोणाला बोलावले नाही असे म्हणता येऊ शकत नाही.
संपूर्ण सृष्टीचे स्वामी प्रभू रामांच्या मंदिर लोकार्पणाचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची कोणी वाट पाहत बसण्याची गरज नाही. २२ जानेवारी रोजी देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन हे भगवान श्री रामाचे मंदिर आहे असे मानून दुपारी ११ ते २ या वेळेत पुजेमध्ये सहभागी व्हावे असे सांगण्यात आले आहे. देशातील प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म, प्रत्येक संप्रदाय आणि प्रत्येक व्यक्तीला हे आमंत्रण आहे. अशा प्रकारच्या पुजेत बिना आमंत्रणाचे सहभागी होण्याला सनातन धर्मात भाग्याचे मानले जाते. त्यामुळे कोणीही आमंत्रणाच्या प्रतिक्षेत न राहता जवळच्या मंदिरात जाऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे असे बंसल यांनी सांगितले.