अयोध्या – बाबरी मशीद कॉंग्रेसने पाडली. त्यामागे उत्तरप्रदेशातील भाजपचे तत्कालीन सरकार पाडण्याचा डाव होता, असा सर्वांनाच चकित करणारा दावा भाजपचे नेते विनय कटियार यांनी केला.
अयोध्येतील बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 या रोजी पाडण्यात आली. त्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निकाल देताना सर्व 32 आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली. त्या आरोपींमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कटियार आदींचा समावेश होता.
त्या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना कटियार यांनी मशीद पाडण्याच्या कटात सामील असल्याचा इन्कार केला. मशीद पाडण्याचा आमचा कधीच मानस नव्हता, असे म्हणत त्यांनी त्यासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले.
बाबरी मशीद पाडण्यात कॉंग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांची काय भूमिका होती यासंबंधी चौकशी व्हायला हवी. काशी, मथुरेतील मशिदींबाबत आंदोलन करण्याची आमची कुठलीही योजना नाही. आता कुठल्याही मशिदींना हात लावला जाणार नाही. देशात शांतता नांदायला हवी, अशी भूमिकाही कटियार यांनी मांडली.