नवी दिल्ली : राम मंदिरासाठीची चळवळ ही स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही मोठी होती, असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यानी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी हे विधान करुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रात याविषयी माहिती देण्यात आली आहे. १९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. पण राम मंदिरासाठीच्या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाले. ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ होती, असे सुरेंद्र जैन म्हणाले.
तसेच राम मंदिरामुळे राम राज्य उभारण्याच्या प्रवासाला सुरवात झाली आहे आणि हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण होईल तेव्हा भारताचं नशीब बदलेल असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, सध्याचे शतक हे रामाचंच आहे. मंदिरासाठी दान करण्याची चळवळ ही संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारी ठरली आहे. यामुळे हे सिद्ध होतं की फक्त राम या देशाला एक करु शकतो. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देश दुभंगलाच आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांच्या सब के राम या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान रविवारी जैन बोलत होते. ते असंही म्हणाले की, राम मंदिराच्या चळवळीमुळे हिंदू खडबडून जागे झाले आहेत. ही चळवळ हिंदूसाठी आत्मसाक्षात्कार घडवणारी ठरली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार म्हणाले, हिंदुत्वाची भावना क्षीण होत चालली आहे असे म्हणणाऱ्यांच्या शंकांचे उत्तर राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांमुळे मिळाले आहे. राम मंदिर आंदोलनामुळे हिंदू समाजाला आत्मसाक्षात्कार झाला आहे. याने हिंदू समाजाला जागृत केले. आंदोलन हे प्रतिक्रियेचा परिणाम नसून हिंदूंच्या बांधिलकीचा परिणाम आहे.