राहुरी – आघाड्याचे राजकारण फार काळ चालत नाही.त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तरी यशस्वी होणार नाही. देशातील जनतेच्या मनात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यात निर्धार कायम असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे सात्रळ येथे आयोजित महा जनसंपर्क अभियानात मंत्री विखे बोलत होते. मंत्री विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून योजनांची माहीती दिली. या वेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, विश्वास कडू आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून, राजकारणात टीका केली जाते. परंतु टीका करण्याची पातळी ठाकरे यांनी सोडली. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले. हा महाराष्ट्राला कलंकच होता, असा थेट आरोप त्यांनी केला.
केवळ व्यक्तिद्वेषापोटी मोदींवर टीका करण्याचे काम सुरू आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टीका करतात. परंतु त्यांना निवडणुकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचे संख्याबळही या पक्षाकडे आता राहिलेले नाही. परंतु या विरोधकांना जनतेच्या मनात कोणतेही स्थान नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 9 वर्षांत केलेली कामगिरी संपूर्ण जगासमोर आहे. आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत देशाकडे पाहिले जात आहे. समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मार्ग मोदींनी सर्वांना दाखवून दिला.
या वेळी कर्डिले यांनी “शासन आपल्या दारी’ उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केला जाणार असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रांताधिकारी सावंत यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आपल्या भाषणात दिला. या वेळी अनेक युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे सर्वांनी स्वागत केले.