पाकिस्तान लष्कराचा आरोप
इस्लामाबाद – भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत हे बेजबाबदार वक्तव्ये करून युद्ध भडकावण्याचे काम करीत आहेत अशी टीका पाकिस्तान लष्कराने केली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेश असल्याचे त्यांचे वक्तव्यही असेच प्रक्षोभक वक्तव्य होते असेही त्यांनी म्हटले आहे. रावत यांनी गेल्या शुक्रवारी एका व्याख्यानात हे वक्तव्य केले होते त्यावर पाक लष्कराने हीं प्रतिक्रीया दिली आहे.
त्यावर बोलताना पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले आहे की भारतात चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे त्या पदावर आपली दावेदारी मजबूत करण्यासाठीच जनरल रावत हे असली वक्तव्ये करत असावेत.
लष्करी नितीमत्ता आणि पदाचे भान सोडून ते हीं बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या खोट्या दाव्यानंतर लष्करप्रमुखांनी आपली सेना ही एक दुष्ट दल बनवले असून ते आपल्या सैनिकांच्या मृत्युला कारणीभूत ठरत आहेत असा दावाहीं गफूर यांनी केला.