मुंबई- मागणी नसल्यामुळे बऱ्याच देशाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तूंची आयात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात बऱ्याच वस्तूच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे महागाई आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे भारतासह जागतिक पातळीवर शेअर बाजारात जोरदार खरेदी चालू आहे. भारतात सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक वाढून आता ते दोन आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 433 अंकांनी वाढून 53,161 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 132 अंकांनी म्हणजे 0.85 टक्क्यांनी वाढून 15,800 अंकावर बंद झाला.
गेल्या तीन दिवसात सेन्सेक्स तब्बल 1,378 अंकांनी म्हणजे अडीच टक्क्यांनी वाढला आहे. जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, कच्च्या तेलासह विविध वस्तूंच्या किमती कमी होत असल्यामुळे आता भारताला आयात स्वस्तात पडेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
युरोपियन देश, चीन आणि अमेरिकेकडून मागणी कमी होऊ लागली आहे. एल अँड टी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, एअरटेल, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बॅंक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंक, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, धातु, ऊर्जा यासह सर्वच क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. त्याचबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप आणि मिड कॅप दीड टक्क्यांपर्यंत वाढले. भारताची देशांतर्गत परिस्थिती स्थिर असली तरी परदेशी परस्थिती लवचिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे जागतिक परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. एखादी नकारात्मक घटना घडल्यानंतर पुन्हा विक्रीचा मारा चालू होऊ शकतो.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
दरम्यान शेअर बाजार निर्देशांक वाढत असले तरी परदेशी गुंतवणूकदारांकडून मात्र भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2,353 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. हे गुंतवणूकदार वर्षभर विक्री करीत राहण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांनी अगोदर व्यक्त केले आहे