मंचर (प्रतिनिधी) – मंचर येथील माझी मुलगी विवाहिता अनुष्का केतन गावडे हिच्या संशयास्पद मृत्यु संदर्भात कारणीभूत ठरलेला तिचा पती केतन गावडे हा दोन महिन्यापासून अद्यापही मोकाटपणे फिरत आहे. मंचर पोलिसांनी त्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन मयत विवाहिता अनुष्का हिचे वडील अतुल आनंद बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनात मयत विवाहिता अनुष्का हिचे वडील अतुल बांगर (मु.पो. बेल्हे, ता.जुन्नर) यांनी म्हटले आहे की, मंचर ता. आंबेगाव येथे माझी मुलगी अनुष्का हिचा विवाह १ एप्रिल २०२१ रोजी निरगुडसर बेलसरवाडी येथील गुलाब याचे चिरंजीव केतन गावडे याच्याशी झाला.
लग्नात मानपान नीट केला नाही, हुंडा दिला नाही, चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरावरून पैसे आणावे, या कारणावरून अनुष्का (वय २५, रा. मंचर मूळ रा. बेलसरवाडी ता.आंबेगाव) हिचा संशयास्पद मृत्यू झाला. २५ जानेवारी रोजी अनुष्काची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर आम्ही मंचर उपजिल्हा रुग्णालयात रात्री गेलो असता तिच्या नाका तोंडातून रक्त व फेस आला.
तिचे शरीर काळे निळे पडून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत तिच्या सासरच्या लोकांनी संशयास्पद उत्तरे दिल्याने तिचा पती, सासरे, सासू व जाऊ यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील चौघांना अंतरिम जामीन खेड न्यायालयाने मंजूर केला असून मुख्य संशयित आरोपी केतन गावडे अद्यापही फरार आहे.
मयत अनुष्का हिचा पती केतन गावडे हा घटना घडल्यानंतर गेली दोन महिने फरार असून मंचर पोलीस व एलसीबीचे पथकही त्याला पकडण्यासाठी कार्यरत आहे. संशयित आरोपीला लवकरच अटक होईल. – अरुण फुगे, पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे.