नेवासा – तालुक्यातील 5 मंडल अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे, सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी व अतिवृष्टी अनुदान देऊन धीर द्यावा, अशी मागणी आ. शंकरराव गडाख यांनी या वेळी केली आहे.
तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व नेवासा तालुका खरेदी-विक्री संघ संचालक सत्कार समारंभप्रसंगी आ. गडाख बोलत होते. या वेळी माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा येथे शेतकरी मेळावा झाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले.
या वेळी आ. गडाख म्हणाले की, तालुक्यातील गावागावात विकासकामे करण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. कांदा, सोयाबीनसह व सर्वच पिके वाया गेली आहेत. उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.प्रशासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही आ. गडाख यांनी या वेळी स्पष्ट केले.
माजी आ. अभंग म्हणाले की, आ. गडाख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध संस्था प्रगतिपथावर आहेत. विजयी उमेदवारांनी संघटना बांधणीच्या कामास वेळ देऊन संघटना वाढण्यास सहकार्य करावे. या वेळी गणेश भोरे, काकासाहेब गायके, देसाई आबा देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार नंदकुमार पाटील यांनी मानले.
आशेचे वातावरण!
शेतकरी प्रश्नासाठी आ. शंकरराव गडाख यांनी आग्रही भूमिका घेतली असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांत समाधानाचे व आशेचे वातावरण आहे.