नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये भारताचा विकासदर साधारणपणे 9.2 टक्के राहील असे सरकारला वाटते. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार या वर्षाचा विकास दर 9.2 टक्के इतका राहील. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे भारताचा विकास दर 7.3 टक्क्यांनी कोसळला होता म्हणजे उणे 7.3 टक्के इतका झाला होता. मात्र गेल्या वर्षी आणि या वर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर वाढला आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा विकास दरही वेगाने वाढत आहे.
त्यामुळे या वर्षाचा एकूण विकास दर निश्चितपणे 9.2 टक्के राहील असे सांगण्यात आले. 2000-21 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 124. 53 लाख कोटी रुपये होते. 2021-22 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न वाढून 135.22 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. या वर्षीत मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राचा विकास दर 12.5 टक्के इतका राहील. गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकास दर 7.2 टक्के इतका होता. खान क्षेत्राचा विकास दर 14.3 टक्के तर व्यापार क्षेत्राचा विकास दर 11.9 टक्के राहण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बॅंकेने या वर्षाचा विकास दर 9.5 टक्के इतका होईल असे सांगितले आहे. सांख्यीकी विभागाने जाहीर केलेला अंदाज रिझर्व्ह बॅंकेच्या अंदाजापेक्षा कमी आहे. मात्र दरम्यानच्या काळात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीतील उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे विविध पतमुल्यांकन संस्थानी आपल्या विकास दर अंदाजात घट करण्यास सुरुवात केली आहे.